नारायणजी आप जैसे शिक्षक राष्ट्र निर्माण का कार्य कर रहे है – माजी राष्ट्रपती रामनाथजी कोवींद

माजी भारताचे आदरणीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंदजी यांची एक संस्मरणीय भेट

नारायणजी आप जैसे शिक्षक राष्ट्र निर्माण का कार्य कर रहे है -  माजी राष्ट्रपती रामनाथजी कोवींद



              नगर-  “प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थी जीवनाचा पाया असतो. या वयात केलेले संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर सोबत करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेतील शिक्षक कायम स्मरणात राहतात.नारायणजी आप जैसे प्राथमिक कक्षा के शिक्षक राष्ट्र निर्माण का कार्य कर रहे है, असे म्हणत भारताचे महामहीम माजी राष्ट्रपती रामनाथ किविंदजीनी त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षकांच्या आठवणीना उजाळा देत नवीन शैक्षणिक धोरण, प्राथमिक शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन आणि चर्चा केली. 


बालदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांच्याशी मुलं आणि प्राथमिक शिक्षण या विषयी त्यांनी इथल्या १२ जनपथ या आपल्या कार्यालयात भेट देऊन चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.



               ” एक प्राथमिक शिक्षक म्हणून हा माझ्यासाठी खूप सन्मानाचा आणि आनंदाचा दिवस होता, कारण मला बालदिनाच्या पूर्वसंध्येला भारताचे महामहीम माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंदजी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काम करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता शिक्षक म्हणून, माझ्यासाठी हा अतिशय समृद्ध करणारा आणि मनःपटलावर सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला क्षण होता. 



अश्या राष्ट्रीय नेत्या सोबत, देशांच्या माजी प्रथम नागरिक राहिलेल्या गणमान्य व्यक्तिमत्त्वासोबत शिक्षण आणि अध्यापनावर चर्चा करण्याची संधीची मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो आणि बालदिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला. हा दिवस आला तेव्हा, मला माझ्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक प्राथमिक शिक्षकासाठी अभिमान वाटतो आहे, 


जो आपल्या जीवनाचे समर्पण भविष्यातील पिढ्यांच्या भरण पोषण, जडणघडण करण्यासाठी करतो. या भेटीने माझा प्राथमिक शिक्षकांच्या समाजातील प्रभावाबद्दलचा विश्वास आणखीन दृढ केलाआहे. …!!” असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.


                 “मैं जब राष्ट्रपती बना था तो अपने शिक्षकोंसे आशिष वचन लेने गया था. असे सांगत सर पुढे म्हणाले, ” मला माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक अजून आठवतात, त्यांनी माझ्या वडिलांना मी सगळ्या गोष्टीत अव्वल म्हणजे प्रथम राहील असे सांगितले आणि खरंच आयुष्यात मी देशाचा प्रथम नागरिक झालो….!!” असे सांगत आपल्या शिक्षकांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत त्यांच्या आठवणीना उजाळा ही दिला. आपण आत्मचरित्र लिहीत आहोत आणि त्यात आपण आपल्या शिक्षकांच्या यासारख्या आठवणींचा उल्लेख ही करणार आहोत…. ” असे ही ते पुढे म्हणाले. 


              आजचा सूर्योदय काही नवी चेतना, नवी अशाच घेऊन आला होता जणू. सरांच्या कार्यालयात पाऊल टाकताच, मला त्यांच्या संपूर्ण कार्यालयाकडून अतिशय आदराची, आपुलकीची आणि सन्मानाची वागणूक आणि स्वागत अनुभवयाला मिळाले. विशेषतः श्री अमरीक सिंगजी, जे सरांचे खासगी सचिव आहेत त्याचे उत्साह वाढवणारे बोल आणि प्रेरणादायी शब्दांनी शुभ संकेत दिले. त्यांनी केलेली मदत आणि स्नेहपूर्ण साहाय्याने सरांच्या सोबतचा माझं अनुभव आणखीनच संस्मरणीय बनला. त्यांच्या टीमने ज्या आदर आणि आदरातिथ्याचे वातावरण निर्माण केले, ते राष्ट्रपती कोविंदजींच्या स्वतःच्या मूल्यांचे प्रतिबिंब होते हे मला सरांची भेट झाल्याक्षणी लक्ष्यात आले.


             पुढे चर्चेत नवी शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०) आणि ते भारतीय शिक्षण व्यवस्थेत कसा बदल घडवणार आहे, त्यात ही शिक्षकांची भूमिका, विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर त्याचा पडणारा प्रभाव इत्यादी मुद्द्यांना स्पर्श केलं. राष्ट्रपती कोविंदजींनी धोरणात प्राथमिक साक्षरता आणि अंकज्ञानावर दिलेल्या भराबद्दल त्यांचे कौतुक केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विशेषतः ग्रामीण भागात परिवर्तन अनुभवता येईल, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी ठाम विश्वासाने सांगितले की प्राथमिक शिक्षक हे या धोरणाच्या यशाचे खरे आधारस्तंभ आहेत. “प्राथमिक शिक्षक हे खरे राष्ट्रनिर्माते आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्याकडून हे शब्द ऐकणे हे खूपच प्रेरणादायी होते.


           सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतःच्या क्षमतांना प्रोत्साहित करणारे आणि समावेशक शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी एनईपीच्या उद्दिष्टांवर चर्चा केली. सरांनी प्राथमिक स्तरावर सर्जनशील आणि व्यावहारिक शिक्षणाचे महत्त्व ही अधोरेखित केले, कारण या वयात विद्यार्थी सर्वाधिक जिज्ञासू आणि ग्रहणशील असतात असे ते म्हणाले. त्यांनी भारताच्या भावी पिढ्यांचे एक शिक्षक म्हणून प्राथमिक शिक्षक करत असलेल्या संगोपनाचे शिक्षकांच्या कष्टांचे कौतुक केले आणि शिक्षकांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाचे समर्थन करत राहण्यासाठी ही प्रोत्साहित केले.



             “माझ्या साठी ही भेट आयुष्यातील एक अनमोल ठेवा आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखण्याची, समजून घेण्याची आणि प्रेरणा देण्याची माझी बांधिलकी अजून मजबूत झाली. राष्ट्रपती कोविंदजींच्या शब्दात सांगायचे झाले तर, “शिक्षक आपल्या वर्गात देशाचे भविष्य घडवतात.”

             

 ” भेट संपल्यानंतर, मी राष्ट्रपती कोविंदजींच्या शब्दांसह आणि त्यांच्या प्रोत्साहन देणाऱ्या सन्मानाने पुन्हा नवचैतन्याने भारावून गेलो. या अनुभवातून मिळालेला उत्साह, आनंद आणि प्रेरणा मला आणखीन नव्या जोमाने कार्यप्रवण करेल. या अनमोल संधीबद्दल मी राष्ट्रपती कोवींद सरांचा मनापासून आभारी आहे आणि सरांच्या कार्यालयातील संपूर्ण टीमच्या संस्मरणीय आदरातिथ्याने मला जिंकून घेतले आहे, आपलेसे केले आहे. ” असे नारायण मंगलारम आपल्या मनोगतात म्हणाले.


            नारायण मंगलारम यांनी ही यावेळी माजी राष्ट्रपती यांना आपल्या शाळेत, जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. नव्या तंत्रज्ञानाचा अध्ययन, अध्यापनात वापर आणि त्याची उपयुक्तता ही सांगितली.