विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता गरजेपुरताच उपयोग करावा – प्राचार्य अजयकुमार बारगळ

 रुपीबाई बोरा उच्च माध्यमिक विद्यालयात इ.11 वी विद्यार्थ्यांचे स्वागत

विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता गरजेपुरताच उपयोग करावा - प्राचार्य अजयकुमार बारगळ




     अहमदनगर (प्रतिनिधी)   –  आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत आहे,  जागतिकीकरणामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्र खुले झाली आहे; त्यामुळे करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. आपल्या क्षमता आणि आवड ओळखून त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करुन अभ्यास केला तर ते निश्‍चित यशस्वी होतील. 10 वी हा पहिला टप्पा आपण पुर्ण केला आहे.


 यापुढील टप्पे आपल्या जीवनाला आकार देणारे असल्याने विद्यार्थ्यांनी नेहमीच उच्च ध्येय ठेवून ते साध्य करण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विविध कौशल्य आत्मसात करुन कठोर परिश्रम केल्यास यश निश्‍चित मिळेल. अहमदनगर एज्युकेशन सोसाटीच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळत आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्यातील गुणांचा विकास करुन आपली प्रगती साधावी.  मोबाईलच्या आहारी न जाता गरजेपुरताच उपयोग करावा. इ.12 वी विद्यार्थ्यांनी स्वागत करु मैत्रीची वीण बांधली आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अजयकुमार बारगळ यांनी केले.


     रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.11 वी कला व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्त स्वागत इ.12 वी विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य अजयकुमार बारगळ, उपप्राचार्या सौ.वंदना आरण्ये आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी उपप्राचार्या सौ. वंदना आरण्ये म्हणाले, विद्यार्थी दशेत आदर, एकाग्रता, महत्वकांक्षा, शैक्षणिक मुल्य जोपासण्याचे काम करावे. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम करतात. आपल्या प्रगतीची दारे या वर्षांपासून खुली होत असतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून शिक्षक व पालकांची अपेक्षापुर्ती करावी, असे आवाहन केले.


     इ.12वीचा विद्यार्थी चैतन्य पांचाळ याने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमनाथ नजान, संकेत क्षेत्रे, सागर राऊत, सुनंदा खंडागळे, गायत्री रायपेल्ली, सविता लोखंडे, रेणुका कुलकर्णी, मेघा जोशी, शिल्पा गांधी, कला शिक्षक अनिल काळे,  कु.भाग्यश्री थोरात यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी राधिका महामुनी व प्रेरणा गायकवाड यांनी केले तर आभार कु.किर्ती गुंड यांनी मानले.


     इ.11 वीच्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक मुथा, स्कूल कमिटीचे चेअरमन गौरव मिरीकर, सल्लागार भुषण भंडारी आदिंनी शुभेच्छा दिल्या.