श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी) – सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी, अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल, त्यांनी सदासर्वदा अखंड रामनामाचे स्मरण करावे. कलीयुगात उद्धरुन जाण्यासाठी भगवद्भक्ती आणि रामनाम स्मरण या शिवाय उपाय नाही. सत्संगती हे परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे, असे निरुपण हभप सुंदरदास रिंगणे यांनी केले.
शिलाविहार येथील मंदिरात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी भाविकांनी सकाळी 5.55 मी. श्रीं च्या मुर्तीवर, पादुकांवर फुले अर्पण करुन गुलाल उधळला. यावेळी श्री. गोंदलेकर यांच्या जीवन चरित्रावर निरुपण करण्यात आले. यावेळी हभप सुंदरदास रिंगणे, सौ.रेखाताई रिंगणे, हभप धनंजय महाराज क्षीरसागर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप रिंगणे म्हणाले, विषयासक्त वृत्तीने बंधन निर्माण हाते तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्षलाभ होतो. जगातील सर्व दृश्य गोष्टी या अशाश्वत आहेत, हे समजून रहावे. एक भगवंतच तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे जाणून अहोरात्र राम नामात आपला काळ घालवावा म्हणजे जीवन सार्थक होईल.
श्री.गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पहाटे रुद्राभिषेक करुन, रामनामाचा जप, आरती करण्यात आली. दुपारी महाप्रसादाने पुण्यतिथी उत्सवाची सांगता झाली. ब्रह्मचैतन्य सेवा भावी मंडळाने परिश्रम घेतले. महापुजेचे पौरोहित्य हभप धनंजय महाराज क्षीरसागर यांनी केले.