सामाजिक कार्यामुळे तांबोळी यांच्याकडे राष्ट्रवादीची महत्त्वाची जबाबदारी : दादाभाऊ कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी): येथील हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी तांबोळी यांचा सत्कार केला. यावेळी इकबाल शहा, रियाज शेख, मोहंमद इराणी, फारुक रंगरेज, ॲड. हनिफ बाबूजी, आबिद दुल्हेखान, खलिल सय्यद, उमर टेलर, आरिफ सय्यद, सय्यद खलिल अब्दुल्ला तांबोळी, ओसामा तांबोळी, जावेद तांबोळी, मोहंमद युसूफ सर, शफी तांबोळी, अकिल शेख आदी उपस्थित होते.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, तांबोळी यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे त्यांनी उत्तम प्रकारे संघटन केले असून, जिल्ह्यातही मुस्लिम समाजाचे उत्तम प्रकारे नेतृत्व करत आहेत. शहरात सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. अन्याय विरोधात आवाज उठवून समाजाला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. तर उद्योग व कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम त्यांनी केले.
समाजातील युवकांना सातत्याने योग्य पध्दतीने दिशा देण्याचे कार्य ते करत असतात. पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांच्याकडे असलेले कार्यकर्ते हेरण्याची व त्यांचेकडे योग्य जबाबदारी सोपविण्याच्या कौशल्याने तांबोळी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगून, त्यांनी तांबोळी यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना हाजी शौकतभाई तांबोळी म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना सर्व प्रश्नांची जाण असून, ते प्रश्न सोडविण्याची धमक देखील त्यांच्यात आहे. महाराष्ट्राच्या विकासात्मक वाटचालीत ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. तांबोळी जमातीसह विविध जमातींना 1972 मध्ये ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ओबीसी समाजाला त्यांनी नेहमीच न्याय देण्याचे काम केले. मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज त्यांना जोडला गेला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांना बळ देण्यासाठी कार्य केले जाणार असून, मुस्लिम समाजासह ओबीसी समाज त्यांच्याकडे एकवटणार असल्याचे त्यांनी सांगितले.