Ahmednagar Akashvani: अहमदनगर आकाशवाणी केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेह 75 च्या वतीने शुभेच्छा
अहमदनगर (प्रतिनिधी) – भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव 1957 साली ठरविण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. तेव्हापासून देशातील असंख्य श्रोते यांचे मनोरंजन त्याचं बरोबर विविध योजनांची माहिती, ताज्या घडामोडी, बातम्या आदी माहिती देशातील नागरिकांना आपल्या खास शैलीत देणारे एक मोठे शासकीय माध्यम म्हणजे आकाशवाणी होय.
आज खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपर्यात पोहोचणारी ’आकाशवाणी’ आपली लोकप्रियता टिकवून आहे. नगरच्या आकाशवाणी केंद्रानेही गेल्या 33 वर्षांपासून नगरकरांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन प्रमोदकुमार छाजेड यांनी केले.
अहमदनगर आकाशवाणी केंद्राचा 33 वा वर्धापन दिनानिमित्त स्नेह 75 च्या वतीने नगर आकाशवाणी केंद्राचे प्रमुख राजेंद्र दासरी, श्री.बढे, उद्घोषिका श्रीमती सुषमा अमर, श्रीमती विद्या जोशी, श्री. देशमाने यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्नेह 75 चे विनोद सोलंकी, ईश्वर सुराणा, बाळासाहेब रेणाविकर, सौ.रजनी ढोरजे, प्रमोदकुमार छाजेड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्र प्रमुख राजेंद्र दासरी म्हणाले, आकाशवाणी हे खेड्या-पाड्यांपर्यंत पोहचलेले सर्वात मोठे साधन आहे. यानिमित्त देश-विदेशातील घडामोडी सर्वांपर्यंत सहज पोहचल्या जातात. आजच्या मोबाईलच्या जमान्यातही आकाशवाणीने आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे. श्रोत्यांच्या सहकार्याने नगर आकावाणीने 33 वर्ष सेवा केली आहे. स्नेह-75 च्या सत्काराने आमचा उत्साह आणखी वाढणारा आहे, असे सांगितले.
याप्रसंगी प्रमोदकुमार छाजेड यांनी आकाशवाणी (रेडिओ) विषयीच्या जुन्या आठवणी सांगितले. शेवटी विद्या जोशी यांनी आभार मानले.