न्याय-हक्कासाठी श्रमिक-कष्टकऱ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने संघर्ष करण्याची गरज -उमाशंकर यादव
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी करुन अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. तर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हा प्रभारीपदी सुनील ओहोळ व राजू खरात, जिल्हाध्यक्षपदी उमाशंकर यादव आणि जिल्हा महासचिवपदी राजू शिंदे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
प्रारंभी सिद्धार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, राजू खरात, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा सचिव सुभाष साबळे, शहराध्यक्ष फिरोज पत्रेवाला, शहर विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, जिल्हा बिव्हीएफ दत्तात्रय सोनवणे, नगर शहर विधानसभा प्रभारी गणेश बागल, पारनेर विधानसभा प्रभारी बाळासाहेब मधे, संतोष मोरे, मेजर अंबादास गवंडे, अमजद शेख, उस्मान शेख, जयसिंग यादव आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ म्हणाले की, देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक, कष्टकरी यांच्या वेदनांना हुंकार दिली. आपल्या साहित्यातून त्यांनी श्रमिकांच्या व्यथा मांडल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून कष्टकऱ्यांच्या वेदना जगा समोर आणल्या. आजही समाजात श्रमिक-कष्टकऱ्यांना न्याय मिळत नसून, न्याय-हक्कासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा महासचिव राजू शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात, कामगार चळवळीत व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.