अहमदनगर महाविद्यालयात (Ahmednagar College) कॉम्प्युटर सायन्स विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या टी. वाय. बीएससी परीक्षेत अहमदनगर महाविद्यालयातील (Ahmednagar College) कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये प्रथम क्रमांक यश चिमाजी भिंगारदिवे, द्वितीय क्रमांक फरहन सिद्दिकी शेख व अनिरुद्ध बबन सोनवणे, तृतीय क्रमांक मसीरा अल्ताफ शेख यांना मिळाले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस म्हणाले की, विद्यार्थ्यांना योग्य प्रकारचे शिक्षण आणि विविध नवनवीन शिक्षण पद्धतीचे शिक्षण दिल्यामुळेच आज अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात. भविष्यातही विद्यार्थी या शिक्षणाच्या जोरावर महाविद्यालयाचे आणि आपल्या कुटुंबाचे व देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवतील असे ते म्हणाले.
यावेळी भा. पां. हि.संस्थेचे चेअरमन म्हणाले की, विद्यार्थ्यांचा भविष्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अहमदनगर महाविद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षण दिल्यामुळेच आज महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन करत आहे. कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात चांगले प्लेसमेंट महाविद्यालयाच्या माध्यमातून मिळते आणि नोकरी मिळवण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होत नाही, त्यामुळे महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा शिक्षण घेण्यासाठी कल असतो, हीच अहमदनगर महाविद्यालयाची ओळख देश पातळीवर दिसून येते असे सांगून विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.