Ahmednagar Congress: अहमदनगर शहरासह सात जागांवर काँग्रेसचा दावा

 प्रदेश नेत्यांच्या विधानसभा तयारीला लागण्याच्या सूचना

Ahmednagar Congress: अहमदनगर शहरासह सात जागांवर काँग्रेसचा दावा



मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या आढाव्या संदर्भातील महत्त्वाची बैठक टिळक भवन येथील दादरच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी पार पडली. यावेळी उत्तरेतील संगमनेर, राहता, श्रीरामपूर यासह दक्षिणेतील नगर शहराच्या जागेवर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी प्रदेश नेत्यांसमोर ही जागा कोणत्याही परिस्थितीत पक्षाकडे देत किरण काळे यांना उमेदवारी द्यावी यासाठी जोरदार आग्रह धरला. यासह श्रीगोंदा, कोपरगाव, अकोला हे ही मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची मागणी केली. 


यावेळी बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणूगोपाल, राष्ट्रिय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रांताध्यक्ष आ. नाना पाटोले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. वर्षाताई गायकवाड, अविनाश पांडे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते उपस्थित होते. 


यावेळी बोलताना वाघ, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नगर शहरासह जिल्ह्याच्या एकूण राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील एकूण सात जागांवर दावा केला. दक्षिणेत काँग्रेस विधानसभेची मागील वेळी एकही जागा लढली नव्हती. 


आता महाविकास आघाडी आहे. शिवसेनेने श्रीगोंद्यावर दावा केला आहे. नगरमध्ये किरण काळेंच्या रूपाने काँग्रेसकडे जिंकून येऊ शकणारा तगडा उमेदवार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नगर शहराची जागा ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. राष्ट्रवादीने त्यासाठी लोकसभेला काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड केली पाहिजे, असे यावेळी वाघ म्हणाले. 


बैठकीनंतर माहिती देताना जयंत वाघ म्हणाले की, जिल्ह्यात काँग्रेस अत्यंत बळकट आहे. दोन्ही खासदारांच्या विजयात माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा खासदारकीला एकही उमेदवार नसला तरी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार करण्यासाठी काँग्रेसने जीवाचे रान केले. 


किरण काळे म्हणाले की, थोरात यांच्याकडे आम्ही भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो. त्यामुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार आम्हाला निवडून द्यायचे आहेत. विधानसभेच्या जोरदार तयारीला लागण्याचे आदेश यावेळी प्रदेश काँग्रेसने दिले. यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.