Ahmednagar Congress : मनपाची यंत्रणा चोख असती तर केडगाव आगीतील नुकसान कमी झाले असते, काँग्रेसचे म्हणणे
Ahmednagar Congress अहमदनगर (प्रतिनिधी) : केडगाव औद्योगिक वसाहतीमधील साईराज इंडस्ट्री मधील तेल कंपनीला रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. रविवार असल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मनपाचे अग्निशमन दलाचे बंब नादुरुस्त असल्याने तातडीने पोहोचू शकले नाहीत. हा मनपाचा गलथान कारभार आहे. यामुळे भविष्यात मोठी मनुष्य, आर्थिक हानी होऊ शकते. जर ही यंत्रणा चोख असती तर केडगाव आगीतील नुकसान कमी झाले असते. मनपाने केंद्र सरकारच्या फायर ॲडव्हायझरीच्या निकषांप्रमाणे तात्काळ अग्निशमन केंद्र अद्यावत व सुसज्ज करावीत, अशी काँग्रेसच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे किरण काळेंनी मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आजमितीस नगर शहराची लोकसंख्या साडेपाच लाखांपेक्षा अधिक आहे. त्यानुसार फायर ॲडव्हायझरीच्या निकषांनुसार किमान ५ ते ६ केंद्र असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तीनच आहेत. यातील सावेडी व केडगावचे केंद्र यापूर्वीच बंद आहे. केवळ जुन्या मनपा जवळील केंद्रावरून मदत पाठवली जाते. शहराचा विस्तार लक्षात घेता ५ केंद्रांमध्ये मिळुन कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या सुमारे ६० ते ७० कर्मचाऱ्यांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र १७ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.
यामुळे कुठे आग, पूर किंवा अन्य दुर्घटना घडली तर तात्काळ मदत पोहोचत नाही. महापालिकेच्या स्थायी समितीने आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ३० कर्मचारी भरतीस मान्यता दिली आहे. मात्र ही भरती प्रलंबित आहे. ती तातडीने करावी, असे काळे यांनी म्हटले आहे. नुकत्याच घडलेल्या केडगाव घटनेचा अनुभव पाहता केडगाव, सावेडीमध्ये केंद्र नसल्यामुळे शहराच्या मध्यवस्तीतून मदत पोहोचविण्यात विलंब होतो. यामुळे हानीची तीव्रता वाढते. दोन वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयाला आग लागली होती. यावेळी ११ रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये मनपाची अग्निशमन यंत्रणा अद्यावत व कायमस्वरूपी सज्ज असणे आवश्यक आहे.
असे आहेत ॲडव्हायझरीचे निकष :
मनपाच्या वतीने फायर ॲडव्हायझरीच्या निकषांचे पालन केले जात नसल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. या निकषानुसार पहिल्या १ लाख लोकसंख्येसाठी १ केंद्र तर त्या पुढील प्रत्येक ५०,००० लोकसंख्येसाठी १ केंद्र आवश्यक आहे. दुसऱ्या निकषानुसार १० किलोमीटरच्या परिघात १ केंद्र गरजेचे आहे. तसेच दाट वस्ती आणि धोका असलेल्या भागासाठी देखील केंद्र उघडणे आवश्यक आहे. मात्र संपूर्ण नगर शहरासाठी अवघे एकच केंद्र आजमितीस कार्यरत आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे :
काळे म्हणाले की, अलीकडील काळात शहरात उंच इमारतींची संख्या वाढली आहे. या ठिकाणी आग लागली तर नियंत्रण मिळविण्यासाठी विभागाकडे अद्यावत साधने आवश्यक आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी विभागाने राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे ५५ मीटरची शिडी व एक अद्यावत अग्निशमन वाहनासाठीचा प्रस्ताव दिला आहे. याचा पाठपुरा मनपाने करायला हवा. हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी जाहीर मागणी काळे यांनी केली आहे.
व्यापारी, उद्योजक, नागरिकांना तात्काळ मदत मिळावी :
शहराची बाजारपेठ मोठी आहे. एमआयडीसी मध्ये अनेक उद्योजकांच्या कंपन्या आहेत. नागरी वस्तीत देखील दुर्घटना घडत असतात. अशा वेळी व्यापारी, उद्योजक, नागरिकांना तातडीने अग्निशमन दलाची मदत मिळणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास यामुळे मोठी मनुष्य व आर्थिक हानी होऊ शकते. हे टाळण्यासाठी मनपणे तात्काळ सर्व केंद्र अद्यावत करण्यासाठी पावले उचलावीत, असे काळे यांनी म्हटले आहे.