Ahmednagar Court: जिल्हा परिषद शाळा गोपाळवाडीच्या मुलांनी जिंकली न्यायाधीश, वकील व कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मने
अहमदनगर (प्रतिनिधी) – “मराठी भाषा ही भारतातली एक प्रमुख भाषा आहे, संस्कृत भाषेतील ज्ञान जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना समजत नव्हते तेव्हा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांनी हे ज्ञान मराठी भाषेत महाराष्ट्रातील लोकांना उपलब्ध करून दिले. देशामध्ये अश्या काही मोजक्याच भाषा आहेत ज्यात असे काम झाले आहे आणि त्यापैकी मराठी एक महत्त्वाची आणि अतिशय समृद्ध अशी भाषा आहे.
तुम्ही आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेताय त्यामुळे भविष्यात मोठी भरारी मारू शकाल तेव्हा इंग्रजी शाळेत शिकत नसल्याचा न्यूनगंड मनात कधी बाळगू नका….!!” असे अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें यार्लगड्डा साहेबांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी, तालुका राहुरी येथील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते.
मराठी भाषेचे महत्त्व सांगणाऱ्या एक छोट्या नाटूकलीच्या सुरवातीची प्रस्तावना विद्यार्थ्यांनी न्यायाधीश साहेबांसमोर सादर केल्यावर त्याने प्रभावित झालेल्या साहेबांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतील शिक्षण, मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर अतिशय सुंदर शब्दात मार्गदर्शन केले. न्यायालय, जिल्हा प्रमुख न्यायाधीश आणि त्यांची कामे याविषयी ही साहेबांनी मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
साहेबांचे मराठी भाषेविषयीचे ज्ञान आणि संवाद साधण्याच्या कले नंतर जेव्हा साहेबांनी आपली मातृभाषा मराठी नसून तेलगू आहे हे सांगितले तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप आश्चर्य वाटले. विद्यार्थ्यांनी यावेळी साहेबांना ‘भाषालूनि वेरैना भावं ओक्कटे….!’ हे तेलगू भाषेतील देशभक्तीपर गीत म्हणून दाखवले. त्या गीताचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगत साहेबांनी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक उत्तम आशीर्वाद दिले , शूभेच्छा देत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ दिला व कोर्ट रूम प्रत्यक्ष पाहण्याची परवानगी देत , विद्यार्थ्यांना कोर्ट रूम, विटनेस बॉक्स, आरोपी बसवण्याची जागा हे सगळ पाहण्याची व्यवस्था करून दिली.
तत्पूर्वी शाळेतील विद्यार्थी न्यायालयाच्या परिसरात पाहून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश आदरणीय भाग्यश्री पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली व साहेबांच्या भेटीचा योग जुळवून आणला. ” शालेय विद्यार्थी व त्यातही सरकारी शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्या बाबतीत जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश साहेब यांचे खूप मोलाचे सहकार्य असते, मुलांशी संवाद साधायला साहेब नेहमी उत्सुक असतात. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी न्यायालयत एक तर साहेब म्हणून किंवा वकील म्हणून यायला हवे ….! ” असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील मॅडम म्हणाल्या.
त्यांच्या पर्सनल कॉन्फरन्स रूम मध्ये विद्यार्थ्यांना बसवून त्यांना खाऊ देणाऱ्या अश्या या विराळ्या जिल्हा प्रमुख व सत्र न्यायधिश व न्यायालय पाहून विद्यार्थी हरखून गेले. विधी सेवा कार्यालयाचे अधीक्षक श्री गहेरवार साहेब यांनी त्यासाठी विशेष सहकार्य केले. यावेळी बार असोसिएशनच्या वकिलाच्या बैठीकाचा वेळ होत असतांनाही, ”या विद्यार्थ्यांशी संवाद साधून मी माझा वेळ खर्च नाही केला तर मी माझा वेळ भारताच्या भावी नागरिकांच्या उभारणीसाठी गुंतवला आहे…!!” असे जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश साहेब म्हणाले. यावेळी बार असोसिशनचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट शेडाळे, सचिव ऍडव्होकेट शेळके व ऍडव्होकेट सुरेश लगड व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
साहेबांच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांना अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे स्टेनोग्राफर श्री गणेश सब्बन साहेब, श्री डी बी शिंदे साहेब व श्री एन बी पिरजादे साहेब, सहायक अधीक्षक श्रीम. संगीता कोल्हे यांनी कोर्ट रूम, कॉन्फरन्स हॉल व परिसर दाखवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून खूप मोठे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
“एका छोट्याशा वस्तीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा व सत्र न्यायालयच नव्हे तर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख व सत्र न्यायाधीश , वकील, कोर्ट रूम तिथले कामकाज अश्या समग्र गोष्टी अनुभवण्याची संधी मिळाली. ही संधी या विद्यार्थ्यांना एक वेगळी प्रेरणा देऊन जाईल आणि कदाचित यातीलच कोणी विद्यार्थी उद्या चालून वकील, न्यायाधीश होऊन न्यायदानाच्या पवित्र क्षेत्रात आपले करियर ही करू शकतील.
आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब , आदरणीय पाटील मॅडम यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून ही आज दिलेली संधी व वेळ त्यांना सदैव प्रेरित करत राहील…” असे गोपाळवाडी शाळेचे शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.
“हा आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. आमच्या सारख्या लहान मुलांना सहज समजेल अश्या शब्दात आदरणीय जज साहेबांनी संवाद साधला, आम्हाला मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय…” असे शाळेच्या विद्यार्थिनी जान्हवी गायकवाड व विद्या जाधव म्हणाल्या. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संदीप शेळके यांनी विशेष सहकार्य केले तर केंद्रप्रमुख अशोक शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गरूडकर, गटशिक्षणाधिकारी मोहीनिराज तुंबारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.