Ahmednagar Holi: आपुलकीची पुरणपोळी देऊन मानवता धर्म पाळला – झेबा शेख

 रेल्वे स्थानकावर सायंतारा – स्नेह 75 ग्रुपचा आगळा-वेगळा उपक्रम

Ahmednagar Holi: आपुलकीची पुरणपोळी देऊन मानवता धर्म पाळला - झेबा शेख




     अहमदनगर (प्रतिनिधी)  – माणसाने माणसांची मने जाणली कि एकमेकांचा स्नेह वाढतो. सण, उत्सव साजरे करताना मानवता हा एकमेव धर्म मानला तर जात-पात याला थारा राहणार नाही. प्रवाशांत सर्व समाजाचे लोक एकत्रित प्रवास करतात. निमित्त होळीचे…. प्रवाशांना देणे आपुलकीचे पुरण पोळीचे उपक्रमातून रेल्वे प्रवाशांना पुरणपोळी देऊन मानवता धर्म पाळला, असे प्रतिपादन झेबा शेख यांनी केले.



     अहमदनगर  येथील सायंतारा ग्रुप व स्नेह 75 च्या संयुक्त विद्यमाने होळी उत्सव साजरा करुन अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाऊन प्रवाशांना आपुलकिची पुरणपोळी देऊन त्यांना या होळी सण-उत्सवात सहभागी करुन घेतले.


     यावेळी डॉ.अस्मिता अष्टेकर, आरती खाडीलकर, अजित चाबुकस्वार, प्रमोदकुमार छाजेड, गुलाब गोरे तसेच ग्रुपचे सदय्य उपस्थित होते.



     यावेळी पूजा पवार म्हणाल्या, प्रवासी हा एका राज्यातून दुसर्‍या राज्यात, या जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात  जात असतात. प्रवासात सण, उत्सव साजरे करता येत नाही. फास्टफूड शिवाय काही खायला मिळत नाही. होळी सणाच्या निमित्ताने गोड पुरणपोळी प्रवाशाना देऊन सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही छोटासा हा प्रयत्न केला.



     प्रास्तविकात ईश्वर सुराणा यांनी स्नेह 75 च्या माध्यमातून बंधूभाव जोपासित विविध उपक्रम राबविणे एकमेकांविषयी स्नेह, प्रेम निर्माण करुन ते टिकविणे हा उद्देश असल्याचे सांगितले.



     प्रवाशांनी गरम-गरम गोड-धोड पुरणपोळीचा आस्वाद घेत समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन दिनेश गुगळे यांनी केले तर दिलीप कानडे यांनी आभार मानले.