Ahmednagar MVA | मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर शहर मविआची सडकून टीका

 Ahmednagar MVA | मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर शहर मविआची सडकून टीका

Ahmednagar MVA | मतदारांना वेठीस धरणाऱ्या प्रशासनावर शहर मविआची सडकून टीका





अहमदनगर (प्रतिनिधी) |

       शहर विधानसभा मतदारसंघात दुबार नावे, स्थलांतरित व मयत व्यक्तींची नावे असणाऱ्या मतदार यादीवर मविआने हरकत घेतली आहे. याद्वारे मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून काही सत्ताधारी राजकीय मंडळींनी सुनियोजित षडयंत्र रचल्याचा आरोप यापूर्वीच मविआने केला आहे. त्यानंतर निवडणूक प्रशासन जागे झाले असून मतदारांना नोटीसा बजविण्याचे काम सुरू केले आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन मविआने सडकून टीका करत म्हटले आहे की, हा निवडणूक प्रशासनाचा गलथान कारभार आहे. नोटिसा माञ मतदारांना बजावल्या जात आहेत. प्रशासनाने मतदारांना वेठीस धरणे तात्काळ थांबवावे असा इशारा यावेळी दिला आहे. 



            राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम,डॉ अनिल आठरे,विक्रम राठोड, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, संजय झिंजे, नलिनी गायकवाड सह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 



          यावेळी मविआने म्हटले की,तिन्ही पक्षांनी निवडणूक प्रशासनाकडे लेखी हरकत घेतल्यानंतर झोपी गेलेले प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरातील तथाकथित कार्यसम्राट नेत्याशी संगनमत करत केलेल्या बोगस मतदार नोंदणीच्या स्कॅमचा भांडाफोड मविआने केला. आता प्रशासनाच्या मतदारांना नोटीसा म्हणजे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे कुटील षडयंत्र असल्याचा आरोप नगर शहर मविआच्या नेत्यांनी केला आहे. 



          प्रशासनाने नमुना १४ अंतर्गत नियम १९ (१) (ब) अन्वये मतदारांनाच नोटीसा बजावल्या असून १० सप्टेंबर रोजी आवश्यक त्या कागदपत्रांसह हजर राहण्याचे फर्मान काढले आहे. त्या दिवशी उपस्थित न राहिल्यास मतदारांना आपले काही एक म्हणणे मांडायचे नाही असे समजून मतदार नोंदणी नियम १९६० मधील तरतुदीनुसार नियमोचित कार्यवाही करण्यात येईल असे म्हटले आहे. नियमाचा बडगा दाखवून पुन्हा एकदा संगनमत करत जी खरी मतदारांची नावे आहेत ती सुद्धा वगळण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप मविआने केला आहे. कोणत्याही खऱ्या मतदाराचे नाव प्रशासनाने वगळल्यास नगर शहरामध्ये मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मविआने दिला. 



   यावेळी बोलताना मविआचे नेते म्हणाले की, ज्या वेळी मतदारांच्या हातात नोटीसा पडल्या त्यावेळी त्यांना जबर मानसिक धक्का बसला. मतदाराला माहितीच नव्हते की त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्यांचे दुबार नाव नोंदवत बनावट निवडणूक ओळखपत्र तयार केली गेली आहेत. आपल्या देशात मतदान ओळखपत्र हे अनेक शासकीय पुरावा म्हणून वापरण्यात येणाऱ्या ओळखपत्रांप्रमाणे विविध कामांसाठी ओळखपत्र म्हणून वापरण्याची मुभा आहे. बोगस मतदार नोंदणी करत मतदारांच्या नावाचा गैरवापर करत उद्या कोणी त्यांच्या नावे खोटे कर्ज प्रकरण, शासकीय योजनांचा खोटा लाभ घेत काही घोटाळे केले तर याला जबाबदार कोण ? त्यामुळे मतदारांनी त्यांच्या दुबार नाव नोंदणीला अत्यंत जागरूकपणे स्वतः विरोध दर्शविला आहे. केवळ राजकीय दहशतीमुळे मतदार समोर येऊन बोलू शकत नाहीत. मतदारांना त्यांच्या नावाचा गैरवापर करत दुबार नोंदविले गेले असल्याचे माहितीच नव्हते. मात्र महाविकास आघाडीने हा प्रकार उजेडात आणल्यामुळे मतदारांनी महाविकास आघाडीचे आभार मानले असल्याचा दावा यावेळी केला गेला. 



            मविआने नगर शहर विधानसभा क्षेत्रातील मतदारांसाठी प्रशासनाने बजविलेल्या नोटिसांच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास, अडचणी येत असल्यास मविआच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मविआचे कार्यकर्ते त्यांना सर्वतोपरी सहकार्य करतील असे म्हटले आहे. यासाठी काँग्रेसचे किरण काळे, मो. ९०२८७२५३६८, राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर ९१४५६४५६२९, शिवसेनेचे संभाजी कदम, मो. ९४२२२२२००३ यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक  मविआचे हेल्पलाईन क्रमांक म्हणून मतदारांसाठी जाहीर करण्यात आले आहेत.