Ahmednagar RTO: नियम पाळल्यास रस्ते अपघात कमी होतील -हर्षल जगताप

 Ahmednagar RTO: नियम पाळल्यास रस्ते अपघात कमी होतील -हर्षल जगताप

Ahmednagar RTO: नियम पाळल्यास रस्ते अपघात कमी होतील -हर्षल जगताप




पाउलबुधे तंत्रनिकेतनमध्ये सुरक्षा पंधरवडा जनजागृती कार्यक्रम


     नगर – सुरक्षितता ही फक्त घोषणा नसून जीवनाचा एक मार्ग आहे. रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी शासनासह वाहतुक शाखा, आरटीओ महत्वाची कामगिरी पार पाडतात, अनेक उपाययोजना अंमलात आणल्या जातात, पण नागरिकांनी जर प्रतिसाद दिला नाही तर अपघात कसे कमी होतील? रस्ते अपघात नियम न पाळल्यानेच होतात. तेव्हा वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा असे प्रतिपादन परिवहन अधिकारी हर्षल जगताप यांनी केले.


     नारायण डोह येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमध्ये अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सुरक्षा पंधरवडा जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना वाहन चालवितांना पाळावयाचे नियम याची शपथ देण्यात आली. याप्रसंगी परिवहन अधिकारी हर्षल जगताप, कल्पेश सुर्यवंशी, श्रीमती रुपाली खरसे, प्राचार्य बाळासाहेब बोर्डे, जागृती फटांगरे, विश्नाथ आदवडे, रेखा रोटे, प्राध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.


     परिवहन विभागाचे कल्पेश सुर्यवंशी म्हणाले, रस्ते अपघात रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून वाहतुकीचे छोट-छोटे नियम पाळले तरी अपघात कमी होतील. रस्ते अपघातात महिनाभरात नगर जिल्ह्यात 65 जणांचा सरासरी मृत्यू होतो. वाहतुकीचे नियम हे आपल्यासाठीच आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.


     श्रीमती रुपाली खरसे, जागृती फटांगरे यांनीही विद्यार्थ्यांना वाहने चालवितांना परवाना आवश्यक असतो. दुचाकीवर ट्रीपल सिट जाऊ नये, डोक्यावर हेल्मेट आवश्यक आहे हे सर्व नियम मी पाळेल व रस्ता सुरक्षेबाबत काळजी घेईल, अशी शपथ सर्वांना दिली.


     प्राचार्य बाळासाहेब बोर्डे म्हणाले, तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रस्ते सुरक्षेविषयी केलेली जनजागृती महत्वाची आहे. वाहतुकीचे नियम सुरक्षेबाबतची शपथ घेतल्याने विद्यार्थी नक्कीच तसे अनुकरण करतील, असे सांगितले.

     सूत्रसंचालन विद्युत विभागाचे विश्वनाथ आदवडे यांनी केले तर रेखा रोटे यांनी आभार मानले.