Bhagyodaya School: शाळेतील शिक्षणाबरोबरच उपक्रमातून जीवनाला दिशा मिळते – सुवर्णाताई जगताप

 भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन संपन्न

Bhagyodaya School: शाळेतील शिक्षणाबरोबरच उपक्रमातून जीवनाला दिशा मिळते - सुवर्णाताई जगताप



     अहमदनगर (प्रतिनिधी)  – आजचे युग हे इंटरनेटचे युग आहे, कोणतीही गोष्ट आज एका क्लिकवर मिळते. परंतु हे कसे शक्य होते, त्यामागे किती लोक काम करतात, हे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे. आधुनिकतेचा स्विकार करण्यासाठी शालेय शिक्षण हे तितकेच महत्वाचे आहे. 


त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासास प्राधान्य दिले पाहिजे. मोबाईलचा मर्यादीत उपयोग करुन ज्ञान अवगत करावे. विद्यालयातील शिक्षक हे तुमचे भविष्य घडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत, याची जाणिव ठेवावी. शाळेतील विविध उपक्रम हे आपल्यातील कला-गुणांना वाव देणारे ठरतात. तेव्हा या उपक्रमातून आपल्यातील क्षमता ओळखून त्यादृष्टीने आपण आपली पुढील दिशा ठरवावी, असे आवाहन माजी जि.प.सदस्या सुवर्णाताई जगताप यांनी केले.


     केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन संपन्न झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई जगताप, डॉ.विजय पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, विश्वस्त प्रसाद आंधळे, उद्योजक अशिष पोखरणा, जालिंदर कोतकर, जयद्रथ खाकाळ, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कोतकर, नगरसेविका लताताई शेळके, राहुल कांबळे, गणेश सातपुते, प्राचार्य ज्ञानदेव बेरड आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी डॉ.विजय पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून त्यांचा विकास केला पाहिजे.  आपल्या आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा. त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. शाळेमधून सुसंस्कृत समाज घडविला जातो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सांगितलेल्या सूचना पाळल्यास आपण एक चांगले नागरिक बनू शकतो.


     प्रास्तविकात प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी विद्यालयामध्ये वर्षभर राबविण्यात येणार्‍या शालेय, सहशालेय, उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय सण-उत्सवाबरोबर विद्यार्थ्यांसाठी प्रेरदायी व्यक्तीमत्वांची व्याख्याने त्याच बरोबर स्पर्धा परिक्षा, एनटीएस, एमटीएस, शिष्यवृत्ती, नवोदय आदि परिक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली जाते. त्यात चांगले यश विद्यार्थी मिळवत आहेत. गेल्या वर्षी इ.10 वीचा निकाल 100 टक्के निकाल लागला. विद्यालयाने महात्मा फुले गुणवत्ता वाढ, निर्मल शाळा पुरस्कार, फाईव्ह स्टार मानांकन मिळाले आहेत. यंदा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा विद्यालयाने सहभाग घेतला असून, त्याही उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे सांगितले.


     याप्रसंगी संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरि सहकार्य केले जात आहे. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थींही विविध स्पर्धा, क्रीडा प्रकारात यश मिळवत आहे, याचा संस्थेला अभिमान आहे.


     यावेळी प्रसाद आंधळे, आशिष पोखरणा आदिंनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमातून ऐतिहासिक, सांस्कृतिक, देशभक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता, गणेश आराधना व समाजप्रबोधनपर गीत-नाटिका सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


     यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पांडूळे यांनी केले तर आभार गोविंद कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब कोतकर, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, धनंजय बारगळ, गोरक्ष कांडेकर, एकनाथ होले, अजिनाथ ठुबे, सांस्कृतिक विभागप्रमुख रुपाली शिंदे, रेणुका गुंड, बाळासाहेब कावरे, सुधाकर गायकवाड, गणेश गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.