Dr.Paulbudhe College: डॉ.ना.ज.पाउलबुधे फार्मसी महाविद्यालयात ‘मुलाखत कशी द्यावी’ परिसंवाद संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षणानंतर चांगली नोकरी हे स्वप्न असते. त्यासाठी अभ्यासाबरोबरच सर्वप्रकारची तयारी करत असतो. स्पर्धा, परिक्षा यामध्ये तो उत्तम गुणही मिळवतो. परंतु मुलाखतीत बर्याचवेळा गोंधळ निर्माण होत असतो. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य येते. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे.
आपले व्यक्तीमत्व हे मुलाखतीचे फर्स्ट इंम्प्रेशन असते. तेव्हा विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे. कोणतेही दडपण न घेता विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यावी, स्पष्ट उच्चार, टापटिपपणा, कागदपत्रांची व्यवस्थीत मांडणी असावी. बोलणार्याची मातीही विकली जाते, या उक्तीप्रमाणे आपल्यातील कार्यतत्परता ही मुलाखतीतून सिद्ध होत असते, असे प्रतिपादन डॉ.विखे पाटील एम.बी.ए. महाविद्यलयाचे प्रा.गणेश अंत्रे यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे फार्मसी महाविद्यालयात नुकतेच ‘मुलाखत कशी द्यावी’ या विषयावर डॉ.विखे पाटील एम.बी.ए. महाविद्यालयाचे प्रा. गणेश अंत्रे यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी रामकिसन देशमुख, रामभाऊ बुचकुल, दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे, डॉ.श्रद्धा पाउलबुधे, बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी. फार्मसीच्या प्राचार्या प्रा.अनुराधा चव्हाण आदि उपस्थित होते.
याप्रसंगी रामकिसन देशमुख म्हणाले, संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहे. शिक्षणाबरोबरच नोकरीच्या संधी कशा प्राप्त होतील, या विषयी तज्ञांचे व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नोकरीची चिंता मिटत असल्याचे सांगितले.
यावेळी प्रा.गणेश अंत्रे यांनी अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित परिसंवादात पुर्व तयारी कशी करावी, मुलाखती दरम्यान विचारल्या जाणारे प्रश्न, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत यशस्वी कशी होईल, या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन विचारलेल्या शंकांचे निरसन केले.
प्रास्तविकात प्राचार्य डॉ.निलेश जाधव यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण पुर्ण केल्यानंतर नोकरीसाठी आवश्यक असणार्या गोष्टीची कॉलेजमधून तयारी करुन घेत असल्याने विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढत आहे, असे सांगितले. यावेळी प्राचार्या अनुराधा चव्हाण यांनी परिसंवादाची माहिती दिली.
परिसंवाद यशस्वीतेसाठी डॉ.प्रसाद घुगरकर, डॉ.रोशनी सुर्यवंशी, प्रा.मिलिंद क्षीरसागर आदिंनी परिश्रम घेतले.