Dr.Vikhe Patil College: शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याची बांधिलकी जोपासावी – तहसिलदार अर्चना पागीरे

 डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालयामध्ये ‘कृषिरंग’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Dr.Vikhe Patil College: शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याची बांधिलकी जोपासावी  - तहसिलदार अर्चना पागीरे




     अहमदनगर (प्रतिनिधी)  – कृषी पदवीसाठी बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून मेहनती असतात. ते कोणत्याही आव्हानाला  सामोरे जावू शकतात. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द, चिकाटी व अथक प्रयत्न करुन उचित ध्येय साध्य करावे. 



कृषी क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविण्यासाठी विविध स्पर्धा परिक्षा, फोरम, बॅकींग क्षेत्रात उपलब्ध असणार्‍या संधीचा फायदा घ्यावा. देशासाठी प्रशासकीय सेवेत येवून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्याची बांधिलकी जोपासावी, असे आवाहन तहसिलदार अर्चना पागीरे यांनी  केले.



     अहमदनगर येथील विळद घाटातील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषी महाविद्यालयामध्ये ‘कृषिरंग 2024’ वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. 



याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून तहसिलदार अर्चना पागीरे तर अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड.वसंतराव कापरे, संस्थेचे सेक्रेटरी जनरल डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक (तंत्र) प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, उपप्राचार्य डॉ.एस.बी.राऊत, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.डी.एम.नलावडे उपस्थित होते.


     यावेळी अ‍ॅड.वसंतराव कापरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिकाद्वारे नवनवीन प्रयोग करावेत. त्याद्वारे कृषि क्षेत्रात भरीव योगदान द्यावे. त्याचबरोबर खेळ-कला-छंद जोपासून आपला सर्वांगिण विकास साधावा. संस्थेच्यावतीने आपणास सर्वोतोपरि सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगितले.



     यावेळी प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे म्हणाले, विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासबरोबरच विविध स्पर्धा, प्रशासकीय परिक्षा, खेळ यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थीही त्यामध्ये यश मिळवून कृषी विद्यालयाचे नाव राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकवत आहेत, असे सांगून वार्षिक अहवालाचे वाचन केले.



     यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, बॅडमिंटन, गोळाफेक, कबड्डी, रस्सीखेच अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.



     सूत्रसंचालन डॉ.दिपिका माळवे व डॉ.सुरज खेडकर यांनी केे तर आभार डॉ.एच.एल.शिरसाठ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.