Ganesh Utsav: विचार भारतीचा गणेशोत्सव उत्कृष्ट आरास स्पर्धेत चौपाटी कारंजा मित्र मंडळ व शिवगर्जना प्रतिष्ठाण प्रथम
Ganesh Utsav: अहमदनगर (प्रतिनिधी): उद्बोधन, प्रबोधन, समुपदेशन आणि परिवर्तन या चतुःसुत्रीने राष्ट्रहित साधण्याचे काम करणार्या विचार भारती या सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव उत्कृष्ट आरास स्पर्धेत चौपाटी कारंजा मित्र मंडळ व शिवगर्जना प्रतिष्ठाण या दोन गणेश मंडळांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उद्योजक नरेंद्र फिरोदिया, प्रमुख वक्ते राज्याचे लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे व प्रमुख पाहुणे जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव अॅड.विश्वासराव आठरे यांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.
यावेळी शहरात संस्कृतीक परंपरा जपणार्या 10 ढोल पथकांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष अॅड.अभय आगरकर, रा.स्व.संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ मुळे, गणेशोत्सव आरास स्पर्धेचे प्रमुख अनिल मोहिते, विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे, सहसचिव महेंद्र जाखेटे आदींसह मोठ्या संख्यने युवक, युवती उपस्थित होते. यावेळी उपस्थित वक्ते व पाहुण्यांनी केलेल्या आवाहनानुसार गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढील गणेशोत्सव डि.जे.मुक्त साजरा करण्याचा संकल्प केला.
प्रमुख वक्ते आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी आपल्या पहाडी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आणि संत परंपरेतून समाजाला कशी दिशा मिळू शकते हे पोवाड्याच्या माध्यमातून सांगितले. ते म्हणाले, गणेशोत्सवाच्या मंडळाच्या माध्यमातून तरुणांनी अधिकाधिक समाजास उपोयोगी उपक्रम राबवावेत.
गणेश मंडळ हे कार्यकर्तेघडण्याचे प्रभावी मध्यम आहे. तरुणांनी आपली रग आहे ती डीजेच्या गाण्यावर नाचून नव्हे तर समाजाभिमुख उपक्रमांनी जिरवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातील महाराष्ट्र घडण्यासाठी युवकांनी चांगल्या विचारांच्या संगतीत राहावे, असे आवाहन केले.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नव्याने आलेल्या डीजे संकृतीमुळे खूप बीभत्स स्वरूप आले आहे. हे चित्र बदलाने खूप आवश्यक आहे. युवकांनी ठरवले तर हे शक्य आहे. आपल्या नगर शहराचे नाव लवकरच बदलण्यात येणार आहे. या बदला बरोबरच नगरमध्ये पुढील गणेशोत्सव डीजे मुक्त पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प सर्व युवकांनी करावा. यासाठी विचार भारतीने पुढकार घ्यावा, असे आवाहन केले.
अॅड.विश्वासराव आठरे म्हणाले, शहरात गुंडगिरी, दंडेलशाही वाढत असल्याने शहरातील वातावरण गढूळ झाले आहे. बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांचा नगर शहराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
युवकांनी शहरात अशा गंभीर घटना घडू नये यासाठी प्रयत्न करून दुषित झालेले वातावरण बदलण्यासाठी पुढे यावे. युवकांनी कोणाचेतरी मिंधे न राहता योग्य विचाराने काम करून शहरात परिवर्तन घडवा. वैचारिक परिवर्तनासाठी काम करणार्या विचार भारती सारख्या सस्थांबरोबर काम करा, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात स्पर्धा संयोजक अनिल मोहिते म्हणाले, विचार भारती गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच यंदा प्रथमच गणेशोत्सव देखावे स्पर्धांचे आयोजन केले. यासाठी शहरातील गणेश मंडळांना प्रबोधनात्मक सादर करण्याचे आवाहन केले, त्यास बर्याच मंडळांनी प्राधान्य दिले.
शहरातील ढोल पथकांनी आपली पारंपारिक संस्कृती जपल्याने त्यांचाही सन्मान यानिमित्त विचार भारती करत आहे. विचार भारतीची सकारात्म विचारांची चळवळ समाजापर्यंत जाण्यासाठी युवकांनी यामध्ये सामिल व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र जाखेटे यांनी केले तर आभार प्रशांत मुथा यांनी मानले. निकालाचे वाचन डॉ.विक्रम डिडवाणी यांनी केले. यावेळी भाजपाचे सचिन पारखी, किशोर बोरा, नगरसेवक रविंद्र बारस्कर आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – प्रबोधनात्मक देखावा : प्रथम (रु.21 हजार) – चौपाटी कारंजा मित्र मंडळ. चंद्रयान मोहिम : प्रथम (रु.21 हजार)- शिवगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट, उत्तेजनार्थ – नेहरु मार्केट व्यापारी सार्वजनिक गणेश मंडळ, दाळमंडई तरुण मंडळ, शिवाजी आखाडा तरुण मंडळ मंगलगेट सेवा प्रतिष्ठान, शिवमित्र प्रतिष्ठान आदि मंडळांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात आले.