Jijau Jayanti: थोर व्यक्तींमत्वांचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी -आर.ए.देशमुख

 Jijau Jayanti: डॉ.पाउलबुधे फार्मसीत स्वामी विवेकानंद-राजमाता जिजाऊ जयंती साजरी


Jijau Jayanti: थोर व्यक्तींमत्वांचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी  -आर.ए.देशमुख


     अहमदनगर (प्रतिनिधी) :  स्वामी विवेकानंद हे समाजसेवकासह समाज सुधारक होते. ज्यांच्या विचारांनी लोकांमध्ये क्रांती घडवून आणली आजही सर्वसामान्यांवर त्यांच्या विचारांचा पगडा आहे.  आजच्या तरुणांचे स्वामी विवेकानंद आदर्श आहेत. जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहचत नाही, तोपर्यंत थांबू नका आजचा समाज हा विद्यार्थ्यांमुळे घडणार आहे. 


त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. अशा थोर व्यक्तींमत्वांचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त आर.ए.देशमुख यांनी केले.


     वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी येथे युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे विश्वस्त आर.ए.देशमुख, साई पाउलबुधे, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी.फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, डॉ.शाम पंगा, डॉ.वेणु कोला, डॉ.प्रसाद घुगरकर, डॉ.विजय तारडे, सुधीर गर्जे, डॉ.रोशनी सुर्यवंशी, स्वाती कडनोर शिक्षकवृंद उपस्थित होते.


     यावेळी डॉ.रेखाराणी खुराणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती दिली. राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने महिलांना आदर्श माता रुपाने जगण्याचे नेतृत्व लाभले. प्रत्येक विद्यार्थ्यांची आई ही राजमाता असते, तिचे नाव उज्वल करा. जिद्दीने अभ्यास करा, असे सांगितले.


     यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करतांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रातील माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली अनमल यांनी केले तर आभार पल्लवी कदम यांनी मानले.