Manoj Jarange: मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न सुटला की मुस्लिम समाजासाठीही लढा देणार: मनोज जरांगे
Manoj Jarange: अहमदनगर | मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे शहरात दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी व मराठा समाज एकमेकांच्या मदतीला धावून जातात. एकमेकांना बैल, औत आदींसह अनेक गोष्टींची मदत करतात. एकमेकांच्या लग्नात आम्ही वाढायला असतो, असे आमचे प्रेम आहे. परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे दोन समाजात तेढ झाल्याचे दिसते. असे असले तरी गावोगावी, खेडोपाड्यात मात्र आम्हाला ओबीसींचा पाठिंबा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ’थोडासा धीर धरा’ असे वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारले असता जरांगे म्हणाले, आता धीर किती धरायचा तेच कळेना. त्यांनी एकदा समोर येऊन बोलावे, त्यांना सात महिन्याचा वेळ दिला तरी काही झाले नाही. सात महिन्यात ते कधी भेटायलाही आले नाहीत. त्यामुळे त्यांनी येऊन एकदा भेटावे आणि दूध का दूध व पाणी का पाणी करावे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार का, असे विचारता ते म्हणाले, मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न सुटला की त्यांच्यासाठीही लढा देणार आहे. तसेच धनगर बांधवांसाठीही लढा देणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
बाराबाभळीच्या मदरशात जरांगे पाटील यांनी मुक्काम केला
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेला मोर्चा रविवारी (दि. २१) अहमदनगर जवळील बाराबाभळी मदरशा (ता. नगर) येथे आला.
रात्रीचा मुक्काम बाराबाभळी मदरशा येथे होता. रात्री साडेबारानंतर जरांगे पाटील यांची तेथे सभा झाली. यावेळीही त्यांनी आरक्षण प्रश्नी सरकारला इशारा दिला.बाराबाभळीच्या मदरशात जरांगे पाटील यांनी मुक्काम केला. बाहेर थंडी असल्याने मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची व्यवस्था केली होती.
रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजन घेतले. मदरशातील विद्यार्थ्यांनी त्यांना सेवा दिली. जरांगे यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुराणची प्रत भेट दिली. मदरसा मधील पाहुणचार आणि सेवाभाव जरांगे आणि हजारो मराठा बंधू बघिणींनी अनुभवला आणि सर्व मदरसा सेवेकरांचे आभार मानत आपला मोर्चा पुढे नेला.
वकीलांकडून मराठा बांधवाना ३ टन सफरचंद पाण्याच्या बाटल्यांचे वाटप
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा अनगरमध्ये आल्यावर शहर संघटनेच्या वतीने पदयात्रेत सहभागी झालेल्या हजारो मराठा बांधवाना तब्बल ३ टन सफरचंद व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. उड्डाणपुलाखाली नगर महाविद्यालया जवळ वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे, उपाध्यक्ष अॅड.महेश शेडाळे, सचिव अॅड.संदीप शेळके यांच्या सह वकिलांनी फळांचे वाटप केले.
यावेळी वकील संघटनेचे महिला सहसचिव अॅड.भक्ती शिरसाठ, खजिनदार अॅड. शिवाजी शिरसाठ, सह सचिव अॅड.संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अॅड.अमोल अकोलकर, अॅड.सारस क्षेत्रे, अॅड.विनोद रणसिंग, अॅड.देवदत्त शहाणे,
अॅड.शिवाजी शिंदे, अॅड.रामेश्वर कराळे, अॅड.अस्मिता उदावंत, माजी अध्यक्ष संजय पाटील, माजी उपाध्यक्ष राजाभांऊ शिर्के, गौरव दांगट, महेश काळे, अमितेश झिंजुर्डे, विलास चितळे, राजेश कावरे, कृष्णा झावरे, सुरेश भोर, संदीप बुरके, नवाज शेख, वासिम सय्यद, अनुराधा येवले, वैभव पवार, सचिन तरटे, अभिजित कोठारी आदींसह वकील उपस्थित होते.
आ. जगताप यांच्याकडून जंगी स्वागत
लाखोंच्या मराठा बांधवांसह मनोज जरांगे शहरात दाखल होताच आ. संग्राम जगताप मोर्चात सहभागी झाले. त्यांनी मनोज जरांगे यांचा पुष्पहार घालून स्वागत केले. आमदार जगताप मोर्चात सहभागी होताच तरुणांनी त्यांना उचलून घेत नृत्य केले. त्यांनीही डीजेच्या ठेयावर नृत्य केले. त्यानंतर रॅली पुढे येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आ. जगताप व मनोज जरांगे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जरांगे पाटील नगरमध्ये दाखल होताच आ. संग्राम जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. सोमवारी (दि. २२) मराठा मोर्चाने नगरमधून मुंबईकडे कूच केलीं. त्यांच्या स्वागताची तयारी आमदार जगताप यांनी केली होती. मराठा मोर्चेकरांसाठी अल्पोपहार, फलाहार, पाण्याची व्यवस्था केली. गर्दीची काळजी घेऊन शहरात सहा ठिकाणी प्रशस्त मंडप टाकले होते. स्टेटबँक चौक, चांदणी चौक, एडीसीसी बँक, अरुणोदय हॉस्पिटल, राजयोग हॉटेल, आमदार जगताप यांचे कार्यालय आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.
असा पोलिस बंदोबस्त तैनात होता
दोन अप्पर पोलिस अधीक्षक, ८ पोलिस उपअधीक्षक, ३६ पोलिस निरीक्षक, ९८ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, ११८४ पुरुष पोलिस कर्मचारी, ५० महिला पोलिस कर्मचारी, ४३ वाहतूक शाखेचे कर्मचारी, दोन आरसीपी प्लाटून, एक यूआरटी प्लाटून, दोन एसआरपीएफ कंपन्या, एक सीआयएसएफ कंपनी, दोन बीडीडीएस पथके असा पोलिस बंदोबस्त तैनात होता.