Manoj Jarange: मुंबईतही आम्ही शांततेत बसणार गडबड करणार नाही पण…

Manoj Jarange: मुंबईतही आम्ही शांततेत बसणार गडबड करणार नाही पण…

Manoj Jarange: मुंबईतही आम्ही शांततेत बसणार गडबड करणार नाही पण...



आत्तापर्यंत आपण शांततेत आंदोलन केलं आहे. एकाही पोराने गडबड केली नाही, होऊ पण दिलेली नाही. मराठे शांत आहेत, दिलेला शब्द पाळणारे आहोत हे माझ्या मायबाप समाजाने राज्याला सिद्ध करुन दाखवलं. मुंबईतही आम्ही शांततेत जाणार, शांततेच बसणार, गडबड करणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. 


आम्ही या भूमिकेवर कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.एकदा मी समाजाला शब्द दिला की मी त्यापासून मागे हटत नाही. आजपासून आपले लोक वाढण्यास सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. २६ जानेवारीला महाराष्ट्रातला सगळा समाज आपल्या मुंबईत येणार आहे. मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. 


आता आपल्याला स्वयंसेवक व्हायचं आहे. आजपासून तुमच्या सगळ्यांवरची जबाबदारी वाढली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बैठकीचं ती बैठक सुरु झाली आहे. महाराष्ट्रही आमचाच आहे आणि मुंबईही आमचीच आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आपला मायबाप समाज एकत्र आहे तो तसाच एकवटलेलाच आहे. पुण्यात मी ती एकजूट पाहिली आपण ज्या रस्त्यावरुन चाललो आहोत त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज येतो आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


आपल्या रॅलीत कुणी जाळपोळ किंवा दगडफेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पकडायचं, पळवून लावायचं नाही. त्याला बोटही लावायचं नाही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, तुम्हाला स्वयंसेवक म्हणून हे काम करायचंच आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.


मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्हाला कुणी त्रास दिला तर तुम्ही त्याला त्रास देऊ नका, त्याला माझ्यापर्यंत आणा मग मी तुम्हाला दाखवतो. मला विचारल्याशिवाय कुणी कुठलीही कृती करु नका. आपल्या नावाखाली कुणी राजकारण करतो आहे का? काडी लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मी पोलिसाच्या गाडीत उचलून टाकेन.