Manoj Jarange: सगळेच पक्ष मराठ्यांना वेड्यात काढत आहेत ; सरकारच वातावरण दूषित करीत आहे : मनोज जरांगे
Manoj Jarange: कोणताच पक्ष मराठ्यांचा नाही, हे आतून सगळेच एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढत आहेत’,
असे सांगत आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीतील ठराव फेटाळून लावला.
तसेच, रात्री ९ पासून त्यांनी पाणीत्याग आंदोलनास सुरुवात केली.
सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि ठरावाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
माध्यमातून जाहीर केल्यानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेतली.
‘सरकारने चर्चेसाठी यावे, आरक्षण देण्यास नेमका का वेळ लागतोय, आणखी किती वेळ लागेल
हे सर्व स्पष्ट सांगावे त्यानंतर मराठा समाज निर्णय घेईल’, असे ते यावेळी म्हणाले.
‘आणखी किती बैठका घेता, इकडे आमची माणसे मरत आहेत. सरकारच वातावरण दूषित
करीत आहे. राज्यातील नागरिकांचा सरकारवर रोष आहे. आमचे आंदोलन शांततेत सुरू असून शिंदे-फडणवीस-पवार याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारचीच आहे’, असा इशारा जरांगे यांनी दिला.
आपण ठरवले तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल
‘आपण काही अरेतुरे बोललो, तर वाईट वाटते. ‘फार बोलू नका,’ असे निरोप येत आहेत.
दोन दिवस गोड बोलून बघू. आपण ठरवले तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल.
ते दगाफटका करू शकतात. उपोषण मंडपातून मराठा बांधवांना उचलून गुन्हे दाखल केले जात आहेत.
जाणूनबुजून प्रशासनातील अधिकारी सरकारचे ऐकत आहेत’, असा आरोपही त्यांनी केला.
मराठा आंदोलकांवरील खटल्यात वकिलांनी समोर येत बाजू मांडण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे प्रवक्ते आमदार राणे हे मोबाइलवर फार गोडगोड बोलतात, त्यांनी यापुढे आपल्यासोबत बोलू नये.
प्रत्यक्ष भेटीत भाषणाचे स्क्रिप्ट कोण लिहून देतो या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपण सांगू असे
म्हणत राणे यांनी केलेल्या आरोपाचा त्यांनी समाचार घेतला.