बालघर प्रकल्प च्यावतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन
मौलाना आझाद मुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली – आबीद खान
अहमदनगर:- भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली. त्यामुळे शिक्षण विस्ताराचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी केले.
तपोवनरोड येथील बालघर प्रकल्प च्यावतीने स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, बालघर प्रकल्पचे युवराज गुंड, संजु लोखंडे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना आबीद खान म्हणाले, शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत मौलाना आझाद म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे.
त्यांचे असे मत होते की, देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट दोन कोटीचे होते.
ते 1958 साली 30 कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करुन विकसित केल्या.यावेळी मुख्याध्यापक संजु लोखंडे यांनी ही मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक बालघर चे युवराज गुंड यांनी तर सूत्रसंचालन आशिष आहिरे यांनी केले. आभार विधा खेमनर यांनी मानले.