MPSC Students: परिक्षेतील यश हे स्वत:च्या मेहनतीवर अवलंबून-अजय आगवान

 स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्यावतीने एमपीएससीमध्ये यश मिळविलेल्या विश्वजित कोहकडे व निलेश पालवे यांचा सत्कार

MPSC Students: परिक्षेतील यश हे स्वत:च्या मेहनतीवर अवलंबून-अजय आगवान

        अहमदनगर (प्रतिनिधी)  – विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, निश्चत ध्येय ठेवल्यास यश मिळत असते. आपणास ज्या क्षेत्रात करिअर करावयाचे आहे, त्याविषयी अभ्यास करुन त्यातील बारकावे समजावून घेऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणत्याही परिक्षेतील यश हे स्वत:च्या मेहनतीवर अवलंबून असते. स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व अभ्यासाचे नियोजन कसे करावे, या विषयी योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने ते यशस्वी होत आहे.

 त्याचप्रमाणे  यशस्वी झालेल्या माजी  विद्यार्थ्यांचे अनुभव व मार्गदर्शनही त्यांना मिळत असल्याने परिक्षेसाठी त्याचा मोठा फायदा होत आहे. आज निवड झालेले विश्वजित कोहकडे व निलेश पालवे यांनी मिळविलेले यश हे अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक प्रा.अजय आगवान यांनी केले.

                गुलमोहोर रोड येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यी विश्वजित कोहकडे यांची सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 गट ब तसेच निलेश पालवे यांची राज्य उत्पादन शुल्क एक्झाईज इन्स्पेक्टरपदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निवड झाल्याबद्दल  यश मिळविल्याबद्दल त्यांचा अभ्यासिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक प्रा.अजय आगवान, नायब तहसिलदार गणेश भानवसे, एसटीआय संदिप मुळे, नायब तहसिलदार ऋतुजा पारखे, रविंद्र पाठक, गणेश मोरे, नायब तहसिलदार श्रीमती गायगोपाळे, दिपक चौरे, श्रेयश धाडगे आदि उपस्थित होते.

                सत्कारास उत्तर देतांना विश्वजित कोहकडे म्हणाले, आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, त्यादृष्टीने तयार करुन अभ्यास केल्यास यश मिळत असते. स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून परिक्षेला सामोरे जातांना कोणत्या अडचणी येतात, त्यावर कशी मात करावयाची. प्रश्न व त्याची उत्तरे कशी लिहायची, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावयाचे या विषयी मार्गदर्शन मिळाल्याने परिक्षेत यश मिळाला आहे. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनीही आपले ध्येय निश्चित करुन त्यादृष्टीने अभ्यास करावा, असे आवाहन केले.

                याप्रसंगी निलेश पालवे म्हणाले, अभ्यास किती केला, यापेक्षा अभ्यास कसा केला याला महत्व आहे. कठोर मेहनती शिवाय यश मिळत नाही. मोबाईलचा मर्यादीत वापर हा अभ्यासातील सर्वात महत्वाचा घटक आहे. त्याचबरोबर आपली शारीरिक  तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिकतेचा आपल्या अभ्यासावर चांगला परिणाम होत असतो. त्यामुळे मन लावून अभ्यास करा यश नक्की मिळेल, असे सांगितले.

                यवावेळी गणेश भानवसे, ऋतुजा पारखे, श्रीमती गायगोपाळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. रविंद्र पाठक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्याचा परिचय करुन दिला, शेवटी वर्षा आगवान यांनी आभार मानले.