PM Vishwakarma: अहमदनगर (प्रतिनिधी): नितीन उदमले फाउंडेशनच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या मार्गदर्शनसाठी आयोजित करण्यात आलेला मेळावा समाजातील कारागीर घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम निश्चितपणे करेल. नितीन उदमले यांच्यासारखा वर्ग १ च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केल्याचा अनुभव असलेला उमदा अधिकारी या योजनेत अधिक अधिक लाभार्थ्यांच्या नाव नोंदणीचा संकल्प निश्चित पूर्णत्वास नेईल. त्यांच्या उत्कृष्ठ व्यवस्थापन कौश्यल्यामुळे हे शक्य होईल त्यामुळे या योजनेत नगर जिल्हा आघाडीवर राहील विश्वास नगर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ऍड अभय आगरकर, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, जिल्हा लीड बँक अधिकारी उद्धव देशमुख,संजय खामकर, सेंट्रल बँकेचे उप विभागीय अधिकारी श्री नागरगोजे, महाराष्ट्र बँकेचे उप विभागीय अधिकारी श्री.नाईक साहेब यावेळी उपस्थित होते.
टिळक रोडवरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कारागीर वर्गातील प्रतिनिधी, स्वयं सेवि संस्थांचे प्रतिनिधी विविध समूहाचे प्रमुख, इच्छुक लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. 17 सप्टेंबर ला या योजनेची घोषणा झाली. आणि लगेचच या मेळाव्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
नितीन उदमले फाउंडेशन चे अध्यक्ष नितीन उदमले यांनी या योजनेची सविस्तरपणे माहिती दिली. याचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन लाभार्थ्यांना व्यवस्थित दिसावे आणि योजनेतील बारकावे समजून घेता यावे यासाठी मेळाव्याच्या ठिकाणी मोठ्या एल इ डी वॉल ची व्यवस्था करण्यात आली होती. मेळाव्यास आलेल्या गर्दीचा उच्चांक पाहता या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब फेसबुक वर देखील करण्यात आले.
यावेळी बोलताना पुढे नितीन उदमलें म्हणाले की समाजातील शेवटच्या उपेक्षित कारागीर घटकाला पुढे आणण्यासाठी निश्चितपणे या योजनेचा उपयोग होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारण्यात आली असून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विशेष निर्देशानुसार याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमच्या फौंडेशनच्या उपक्रमाची विशेष दखल घेतली असून आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून आमच्यासाठी त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवला आहे. नगर जिल्ह्यात या योजनेचे एक लाख लाभार्थी तयार करण्याचा संकल्प फाउंडेशनने सोडला असून १ लाख लाभार्थ्यांची नाव नोंदणी आपण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नागरगोजे, प्रा. भानुदास बेरड, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, संजय खामकर यांची भाषणे झाली. तपोवन रोडवरील इंडो आयरिश चॅरिटेबल जोंधळे हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. जोंधळे, बोल्हेगाव येथील बोर्डे, बारा बलुतेदार संघटनेचे माउली गायकवाड, अशोक औटी, लोहार शिक्षण परिषदेचे प्रमुख निवृत्त प्राचार्य कौशे, नेवासा तालुका भाजपा कामगार आघाडी चे प्रमुख विवेक नन्नवरे सी एस आर डी चे प्रा. वाघमारे तसेच सर्व समाजाचे प्रतिनिधी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्वागत आणि आभार हर्षल आगळे व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन झाले. श्याम पिंपळे यांनी सूत्रसंचालन केले.