PMKVY: नितीन उदमले फाउंडेशन चा उपक्रम
PMKVY: अहमदनगर (प्रतिनिधी): नितीन उदमले फाउंडेशनच्या वतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल योजना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १२ ऑकटोबर रोजी सायंकाळी ५ वाजता अहमदनगरच्या टिळक रोडवरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात हा मेळावा संपन्न होतो आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थींनी यात सहभागी होऊन योजनेची माहिती घ्यावी असे आवाहन नितीन उदमले फाउंडेशन चे अध्यक्ष नितीन उदमले यांनी केले आहे.
पी एम विश्वकर्मा कौशल योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय लघु सूक्ष्म तथा मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत बारकाईने लक्ष घातले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अहमदनगरमध्ये फाउंडेशन ने या मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे.
त्यात अहमदनगर जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी बाळासाहेब मुंडे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आहे. जिल्हा लीड बँक मॅनेजर रिजहू बठीजा हे यात विशेषश मार्गदर्शन कारणात आहेत. अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक हर्षल आगळे यांनी दिली आहे.
आपल्या ग्रामीण भागात अजूनही बारा बलुतेदार समाज व्यवस्था शिल्लक आहे . त्यात सुतार सोनार, लोहार, चांभार, तेली,. गवंडी, मिस्त्री, कुंभार, धोबी, शिंपी, मूर्तिकार, शिल्पकार, नाभिक, विणकर, चटई झाडू बनविणारे बुरुड, होड्या बनविणारे नाविक, मासेमारीचे जाळे विणणारे कोळी, हार तुरे तयार करणारे माळी, कुलुपे चाव्या तयार करणारे,पारंपरिक खेळणी बनविणारे अशा सर्वांचा अंतर्भाव होतो.
या सर्वांच्या लघु आणि माध्यम स्वरूपाच्या उद्योगांना चालना मिळावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. भारतातील इतर मागासवर्गीय अथवा खुल्या प्रवर्गातील अठरापगड जातीतील सदस्य जे आपला वडिलोपार्जीत किंवा पारंपरिक व्यवसाय करतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यासाठी विशिष्ट जातीची अशी अट नाही.
फक्त संबंधित लाभार्थी हा तो व्यवसाय करीत आहे याची खात्री बँक अधिकारी आणि योजना अधिकाऱ्यांना झाली की त्याला अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध होणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात अवघ्या ५ टक्के व्याजदरात १ लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपये दिले जाणार आहेत.
तरी या योजनेचा लाभ घरण्यासाठी आणि या मेळाव्यात योजनेविषयी डिजिटल यंत्रणेद्वारे देण्यात येणारी माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.