Samarth School Ahmednagar: श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने दास नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी) – अध्यात्माधिष्ठीत शिक्षणाची आज खरी गरज आहे. एक स्वास्थ मानसिक शांतीपुर्ण नैतिक परोपकाराने मुक्त जीवन जगण्यास शिकविणे आजच्या शिक्षणाची गरज आहे. दैनंदिन शिक्षणाबरोबरच संतांच्या विचारांची, आचरण शिकवण विद्यार्थ्यांच्या अंगी शिक्षकांनी रुजवली पाहिजे. आज पाश्चत्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे, त्यामुळे मुलांवर लहानपणापासून आपल्या भारतीय संस्कृतीचे संस्कार होणे गरजेचे आहे.
समर्थ रामदासी स्वामी यांचे साहित्य, वाङमय हे सर्वांसाठी दिशादर्शक असेच आहे. विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक व बौद्धीकतेबरोबरच आत्मविश्वास वाढीसाठी बहुमोल उपयोग होऊ शकतो. श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाने विद्यार्थ्यांमधील कला-गुण वाढीसाठी स्पर्धांचा उपक्रम राबवत त्यांना प्रोत्साहन देत आहे, असे प्रतिपादन दादेगाव मठाधिपती मंदारबुवा रामदासी यांनी केले.
श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने दास नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन दादेगाव मठाधिपती मंदारबुवा रामदासी यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन विकास सोनटक्के, व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, विश्वस्त सुरेश क्षीरसागर, संध्या कुलकर्णी, सचिन क्षीरसागर, मुख्याध्यापक अजय महाजन, संगीता सोनटक्के, डी.एम.कासार, संगीता जोशी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विकास सोनटक्के म्हणाले, श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या नावे असलेल्या आपल्या संस्थेतून संस्कारक्षम पिढी घडविली जात आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक, संत, महात्म्य, राष्ट्र पुरुषांची ओळख व्हावी, त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. दास नवमीनिमित्त आयोजित स्पर्धांमुळे श्री समर्थ रामदासी स्वामी यांचे कार्य विद्यार्थ्यांना ज्ञात झाले असल्याचे सांगितले.
प्रास्तविकात मुख्याध्यापक अजय महाजन म्हणाले, विद्यार्थी ही सर्वगुण संपन्न व्हावा, हीच शिक्षकांची इच्छा असते. दैनंदिन अभ्यासबरोबरच इतर उपक्रमातून विद्यार्थ्यांचे कला-गुणांना प्रोत्साहन मिळत असते. विद्यालयातील उपक्रमातून विद्यार्थी चांगले यश मिळवत आहेत. दास नवमीनिमित्त चित्रकला, निबंध, हस्ताक्षर, वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, त्यास नगर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा होसिंग यांनी केले तर आभार सतीश मेढे यांनी मानले. याप्रसंगी नगर शहरातील विविध शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.