Sangamner | वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून निषेध : शालिनी विखे पाटील
संगमनेर : वसंतराव देशमुख यांनी भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या मांडला. यामुळे विखे-थोरात कुटुंबियातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले. आता यावर सुजय विखे यांच्या मात्रोश्री शालिनी विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
शालिनी विखे पाटील म्हणाल्या की, वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही निषेध करतो. कोणाची जरी मुलगी असली तरी असं वाक्य कोणतीही महिला सहन करू शकत नाही आणि असं बोलण्याचाही अधिकार कोणाला नाही. कोणीही पातळी सोडून अशी वक्तव्य करू नये.
सुजय विखे विरोधात जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट : शालिनी विखे
कालच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. हा सुजय विखे विरोधात जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट होता हे काल दिसून आलं. कुत्रा हाकलायचं म्हटलं तरी काठी सापडावी लागते. मात्र यांच्या गाड्यांमध्ये काठ्या होत्या, हे पोलिसांना समजलं आहे. कुणी गाड्या जाळल्या? कोण-कोण होतं हे सगळं माहित आहे. आमच्या युवकांना झालेली मारहाण चुकीची आहे.
राजकारण करताना कोणीही एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये. विकासाच्या मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी तो डोक्यावर पडलाय हे बोलणं कितपत योग्य आहे. सुजयच्या भाषणातून कोणतीही अशी टीका झालेली नाही. कालची घटना पूर्व नियोजित कट होता. खालच्या पातळीवर जाऊन जे राजकारण सुरू आहे ते बंद करावे.
वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत: सुजय विखे पाटील
सभेतील झालेलं महिलांचे वक्तव्य निषेधार्थ आहे. महायुतीच्या वतीने कालही निषेध केला व आजही करतो. वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील ज्येष्ठ व थोरात विरोधक म्हणून स्टेजवर आले होते. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं ते स्वतःहून भाषणाला उठले. भाषण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही.
अशा प्रकारच्या खालच्या पातळीचे टीका महायुती स्वीकार करत नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा असं देखील आम्ही पोलिसांना सांगितलं. मात्र हे सगळं घडल्यानंतर ज्याने वक्तव्य केलं तो बाजूला राहिला आणि पुढच्या पंधरा मिनिटात त्या गावच्या एक्झिट पोइंटवर प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे जणांचा जमाव आला. गाड्या थांबवल्या गेल्या, दगड घेऊन गाड्या फोडल्या. आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे समोर आलं असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
साभार सौजन्य tv९ मराठी