अहमदनगरमध्ये 175 जणांनी स्वेच्छेने केले रक्तदान
परोपकार व नि:स्वार्थ भावनेने केलेले रक्तदान ही सर्वोपरि सेवा-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
अहमदनगर (प्रतिनिधी) – रक्तदान ही मनुष्य जीवन वाचविण्यासाठी केली जाणारी एक अशी सर्वोपरि सेवा आहे. ज्यामध्ये परोपकाराची नि:स्वार्थ भावना निहित आहे. जेव्हा आमच्या मनामध्ये निष्काम सेवेचा भाव उत्पन्न होऊ लागतो, तेव्हा हे जग आणखी सुंदर दिसू लागते, असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी दिल्ली येथे आयोजित ‘मानव एकता दिवस’ समारोहाच्यावेळी भाविक – भक्तांना संबोधित करतांना व्यक्त केले.
हेही सर्वविदित आहे की, निरंकारी जगतामध्ये ‘मानव एकता दिवस’ युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीला समर्पित आहे, त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी देशभर सत्संग समारोहाचे व विशाल रुपात रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबीरांची ही श्रृंखला वर्षभर चालू राहते. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आजच्या दिवशी देशभरात जवळपास 207 ठिाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन अंदाजे 50 हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले. दिल्लीतील बुराडी येथील रक्तदान शिबीरात निरंकारी राजपिता रमितजी यांनी रक्तदान करुन मिशनच्या भक्तांसाठी व युवा सेवादारांसाठी प्रेरणास्त्रोत बनले.
निरंकारी मिशनच्या या देशव्यापी महारक्तदान अभियानांतर्गत मंडळाच्या अहमदनगर शाखेच्यावतीने संत निरंकारी सत्संग भवन, सावेडी, अहमदनगर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात एकूण 175 निरंकारी भक्तांनी व रक्तदात्यांनी स्वेच्छेने उत्स्फुर्तपणे रक्तदान केले यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. सिव्हील हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य केले. शिबीरास सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन मिशनद्वारे केल्या जाणार्या नि:स्वार्थ सेवांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. अहमदनगर शाखेचे यंदाचे हे 27 वे वर्ष होते.
निरंकारी मिशनच्यावतीने 1986 साली बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी सुरु केलेल्या रक्तदान मोहिमेने महाअभियानाचे रुप धारण केले असून, या शिबीरांद्वारे आजपर्यंत जवळपास 14 लाख युनिट संकलित करुन गरजू रुग्णांसाठी रक्तपेढ्यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले आहेत.