नितीन उदमले फाउंडेशन आयोजित ‘माझा मान, माझे संविधान’ जागृती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान सर्वपक्षीय एकी झाली तरीही बदलता येणार नाही-डॉ.रमेश पांडव
Sanvidhan: अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला लोकशाहीसाठी पूरक आणि पोषक असे संविधान दिले; त्यामुळे ते परमपूजनीय आहेत. हे संविधान सर्वार्थाने इतके अर्थपूर्ण आणि सक्षम आहे की आपली सर्वपक्षीय एकी झाली तरी ते कुणालाच बदलता येणार नाही.
घटना दुरुस्त्या अनेक होतील पण मूळ संविधान हे घटनेने बदलता येणार नाही, असे मत ज्येष्ठ विचारवंत तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, हिंदू धर्म नीतीचे गाढे अभ्यासक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. रमेश पांडव यांनी व्यक्त केले.
नगरमध्ये सावेडीतील माऊली संकुल सभागृहात नितीन उदमले फाउंडेशन आयोजित ‘माझा मान, माझे संविधान’ या भारतीय संविधान जागृती कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव होते, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांची होती.
डॉ. पांडव पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या व्यापक विचारांती तयार केलेले आणि भारताला दिलेले संविधान हे खरोखरच वरदान आहे. मसुदा समिती हा भारतीय राज्य घटना निर्मिती प्रक्रियेचा आत्मा होता. या समितीचे अध्यक्षपद बाबासाहेबांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून संविधान सभेने स्वतःहून दिले होते. त्या उभयतांचे विचार एकमेकांना पटत नव्हते पण संपूर्ण भारतात या पदावर काम करू शकणारे बाबासाहेब हे एकमेव व्यक्तिमत्व आहे हे त्यांना ठाऊक होते.
भारताची राज्यघटना तयार होताना 385 सदस्य होते. त्यातले काही फाळणीनंतर पलीकडच्या देशात गेले. तिथे त्यांनी तिथली राज्यघटना लिहिली परंतु आज तिकडील बलुचिस्तान, पाक व्याप्त काश्मीर मधील जनता आम्हाला भारतात जायचे आहे असा आग्रह धरते आहे. तो देश भिकेला लागल्याचे चित्र आहे तर भारत मात्र या बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर जगातली तिसरी आर्थिक महासत्ता बनू पाहात आहे, हेच बाबासाहेबांच्या दृष्टेपणाचे द्योतक आहे.
लोकशाही टिकविण्यासाठी संविधानाचे रक्षण सर्वानीच केले पाहिजे. संविधान सर्वानी समजून घेतले पाहिजे, संविधानाने आपल्या मूलभूत हक्क दिले, अधिकार दिले. समाजात ओळख दिली. त्यामुळेच आपण सुखासमाधाने जगतो आहोत. याचा अभ्यास व्हावा, संविधान वाचनाची पारायणे व्हावी, संविधान अंगवळणी पडावे आणि आपल्या भारतातील लोकशाही बळकट व्हावी यासाठी आपण संविधान अभ्यास मंडळे स्थापन केली आहेत. संविधान वाचनातून प्रत्येकवेळी त्याचा नवा खोलवरचा अर्थ आम्हाला उमगतो आहे. बाबासाहेबांनी किती महान संविधानाची निर्मिती केली आहे. याची वारंवार प्रचिती येते आहे. त्यामुळे त्याचा प्रसार सर्वत्र होणे आवश्यक असल्याचे सांगतले. ‘बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो’ या देशभक्तीपर गीताच्या ओळी गाऊन त्यांनी आपल्या व्याख्यानाला विराम दिला.
अध्यक्ष पदावरून बोलताना प्रा.नानासाहेब जाधव म्हणाले की, आपला विशाल भारत देश संविधानाच्या आधारानेच चालतो आहे. तेव्हा संविधानाची गरज काय, त्याचे महत्व काय हे सर्वाना समजावून सांगायला हवे. त्यासाठी संविधान अभ्यास मंडळाची व्याप्ती अधिक वाढवली पाहिजे.
प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परीचय माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन उदमले यांनी करून दिला. ते म्हणाले की, बाबासाहेब आणि संविधान हे अद्वैत आहे. संविधानाचा विषय विशिष्ट परीघा चर्चीले जात नाही. संविधानचा विषय या परिघा बाहेर समाजात चर्चेला घेऊन जाणे या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले डॉ. रमेशजी पांडव, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले नानासाहेब जाधव, भानुदास बेरड आणि प्रमुख सत्कार मूर्ती प्रा. एम एम तांबे हे चौघे प्राध्यापक आहेत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आय. पी. एस. ची सनद घेण्याअगोदर सनदी न्यायाधीश होते. त्यामुळे संविधान हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. चार प्राध्यापक आणि एका माजी न्यायाधीश यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमधील विचारवंत, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्यासमोर हे संविधान अभ्यासले जाते आहे. एका अर्थाने हा लोकशाहीचा जागर आहे.
प्रा. भानुदास बेरड म्हणाले, भारतीय संविधान हा विषय खूप जड वाटतो. समजायला ते अवघड आहे. मात्र संविधानाची उद्देशिका शाळेच्या पाठ्य पुस्तकातून छापलेले असते, पण तेही कुणी वाचत नाही. मुखोद्गत करीत नाही. आज शाळा सुरु करताना पहिला पाठ हा संविधानाचा अर्थ समजावून सांगणारा घ्यायला हवा. नव्हे तसा नियमच करायला हवा. मुलांना संविधान चांगल्या प्रकारे शिकवावे. त्यातूनच नवीन पिढी चांगल्या प्रकारे घडेल आणि आदर्श नागरिक आपल्याला घडविता येतील.
यावेळी राकेश ओला म्हणाले की, लॉ कॉलेज ला प्रवेश घेण्याअगोदर आपण शालेय जीवनापासून पाठयपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेले संविधान वाचत आलो आहोत. हे संविधानाचे प्रस्ताविक मला शालेय जीवनापासूनच कंठस्थ होते. जशी आपल्या भारताची संस्कृती चिरंतन आहे तसंच आपले संविधान देखील आहे. प्रत्येकाने ते आत्मसात करावे.
या कार्यक्रमास जिजाऊ माँ साहेबांचे चौदावे वंशज नामदेवराव जाधव, ज्येष्ठ नेते वाल्मिक निकाळजे, भाजपचे महेंद्र गंधे, पंडित वाघमारे, विनोदसिंग परदेशी, बाबुराव अनारसे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात नुकतीच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य प्रा.एम.एम. तांबे यांचा विशेष सत्कार नानासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शेखर कुलकर्णी यांच्या संविधान गौरव गीताने झाली. दीप प्रज्वलन झाल्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरपुर्वक पुष्पांजली वाहण्यात आली. नंतर भारतीय राज्यघटना आणि उद्देशिका यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रति सर्वाना वाटण्यात आल्या. सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत कोळोखे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.हर्षल आगळे यांनी केले.