जिद्द, अथक परिश्रमाची धमक असेल तर यश निश्चित -आदिनाथ शास्त्री
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोणतेही यश हे सहजा-सहजी मिळत नसते. त्यासाठी जिद्द, अथक परिश्रमाची गरज असते. आपले ध्येय निश्चित असेल, हेतू चांगला असेल तर त्यास परमेश्वराचीही साथ मिळत असते. आज पोलिस उपनिरिक्षक परिक्षा उर्त्तीण झालेल्या सुकन्या सुषमा आव्हाड यांना समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी. समाजातील वाईट प्रवृत्तीचा नायनाट करुन चांगल्या समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन हभप आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केले.
पांगरमल येथील सुषमा आव्हाड यांनी पीएसआय परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तारकेश्वर गडाचे सद्गुरु आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेश्वर, डीवायएसपी अरुण आव्हाड, भगवानबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराज आव्हाड, पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाड, ऋषीकेश आव्हाड, बापू आसाराम आव्हाड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
भिमराज आव्हाड म्हणाले, आजची स्त्री सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. मुली सैन्य दलासह पोलिस खात्यात आपले कर्तुत्व सिद्ध करत आहेत. सुषमा ही पांगरमल सारख्या खेड्यातून प्राथमिक शिक्षण घेऊन भटक्या-विमुक्त विभागातून राज्यात प्रथम येऊन गावाचे नाव राज्यभर झळकविले, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले.
सत्कारास उत्तर देतांना सुषमा आव्हाड म्हणाल्या, आई नंदुताई मजूरी करायची, वडिल हरिभाऊ एसटी ड्रायव्हर, चार बहिणी, दोन भाऊ अशा कुटूंबात मी वाढले. मनात जिद्द, ध्येय ठेवून खूप परिश्रम घेऊन ही परिक्षा उत्तीर्ण झाले. आज आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण झाल्याचे समाधान आहे. गावकर्यांनी माझा केलेला सत्काराने मला प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी अमोल आव्हाड, बापू आसाराम आव्हाड आदिंनीही सुषमा आव्हाड यांच्या यशाबद्दल गौरोद्गार काढले. शेवटी ऋषीकेश आव्हाड यांनी आभार मानले.