Savedi News: चांगले आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली – डॉ.सोनल भालसिंग

 Savedi News:  सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘मानवी आरोग्य विषयी’ चर्चासत्र संपन्न

Savedi News:  सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘मानवी आरोग्य विषयी’ चर्चासत्र संपन्न

     Savedi News:  अहमदनगर (प्रतिनिधी)– मनुष्याचे वय जसजसे वाढते तसेतसे हाडांना ठिसूळपणा येतो. गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी ही लक्षणे हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्याने होत असते. त्यासाठी मानवी शरीराला व्यायाम, योगासन यांची गरज असून, आहारात सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, फळे यांचा समावेश असावा. आपल्या संस्कृतीत चौरस आहाराला विशेष महत्व असून, चांगले आरोग्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन डॉ.सोनल भालसिंग यांनी केले.


     सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे डॉ.सोनल भालसिंग व डॉ.सीमा भालसिंग यांच्या ‘मानवी आरोग्यविषयी’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.


     पुढे बोलतांना डॉ.सोनल भालसिंग म्हणाले, मनुष्याला हाडांच्या मजबुतीसाठी योग्य त्या जीवनसत्वांची आवश्यकता असून ते सत्व आपल्याला योग्य व चौरस आहारातून पूर्ण करता येते. जीवनसत्वांची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध घेऊन किंवा वर्षातून एकदा किंवा दोनदा मेडिकल चेकअप करुन घेणे आवश्यक आहे.


     डॉ.सौ.सिमा भालसिंग यांनी मधुमेह, हायपर टेन्शन यावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, डायबेटीस झाल्यावर घाबरुन जाऊ नये. बैठे काम अयोग्य आहार, स्थुलपणा, अनुवंशिकता यामुळे मधुमेह होतो. तसेच अतिगोड, तळलेले पदार्थ, अयोग्य जीवनशैली याचा मानवी शरीरावर विशेष परिणाम होतो. लोकांमध्ये आजकाल हायपर टेन्शनचे प्रमाण वाढले आहे. कामाचा ताण, जागरण, आर्थिक मानसिक ताण-तणाव यामुळे ब्लड प्रेशरचे प्रमाण वाढते. त्यासाठी व्यायाम, मेडिटेशन रागावर नियंत्रण असावे. जास्तीत जास्त व्यसनांपासून दूर रहावे व आनंदी जीवन जगावे, असे सांगितले.


     यावेळी सभासदांनी आरोग्य विषयी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देत डॉक्टरांनी समाधान केले. यावेळी ज्येष्ठ सभासद पी.एन.डफळ यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच नोव्हेंबर महिन्यातील सभासदांचे वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.


     कार्यक्रमाचे प्रास्तविक शरद कुलकर्णी यांनी केले तर अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी सभासदांसाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास आदिनाथ जोशी, मोरेश्वर मुळे, सुरेश कुलकर्णी, पी.एन.डफळ, पुष्पा चितांबर, ज्योती केसकर, स्नेहल वेलणकर, माधवी कुलकर्णी, बलभिम पांडव, शरद कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योतीताई केसकर यांनी केले तर आभार पुष्पा चितांबर यांनी मानले.