SavitribaiPhule: श्री साई विद्यालय व डोके विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन
SavitribaiPhule: अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात विविध जबाबदार्या अतिशय समर्थपणे पेलत आहे, मात्र त्यांच्या शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या भारतातील पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले होय. त्यामुळे मुला-मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना एक सक्षम नागरिक बनविणे हे प्रत्येक स्त्रीचे कर्तव्य आहे.
प्रत्येक मुलीने सावित्रीबाई फुले बनणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी अशा थोर व्यक्तीमत्वांचा अभ्यास करुन त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन डोके विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे यांनी केले.
निर्मलनगर येथील श्री साई विद्यालय व डोके विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका रिबेका क्षेत्रे, मुख्याध्यापक संभाजी पवार, आशा धामणे, सुजाता कर्डिले, मंदाकिनी पांडूळे, मंजू नवगिरे, ज्योती पवार, राणी राऊत, संजोग बर्वे, श्रृती भालेराव आदिंसह विद्यार्थींनी उपस्थित होत्या.
मुख्याध्यापक संभाजी पवार म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन मोठी क्रांती केली. आज विविध क्षेत्रात महिला आपल्या कार्यकतृत्वाने चमकत आहेत. त्यांच्या या भरीरीची खरी प्रेरणा ही सावित्रीबाई फुले या आहेत, याची जाणिव ठेवली पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी राऊत यांनी केले तर आभार मंजू नवगिरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थींनी कु.प्रियंका शिंदे हीने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभुषेत त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांनासमोर कथन केला.