Shrirampur: अन्यथा नगर पालिकेवर त्रस्त नागरीकांचा मोर्चा – जीशान शेख यांचा इशारा
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
येथील मिल्लतनगर सेक्टर न. ३ मध्ये पावसाळ्यात नेहमीच नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरते,यावेळी देखील तीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने मिल्लतनगरवासी पुर्ते वैतागले असुन वारंवार तक्रार करुनही नगर पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने शेवटी नगर पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध मोर्चे,धरणे आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जीशान शमशोद्दीन शेख यांनी दिला आहे.
याविषयी सामाजिक कार्यकर्ते जीशान शेख आणी त्रस्त मिल्लतनगर वासियांच्यावतीने आज सोमवार दि.२६ ऑगस्ट रोजी न.पा. उपमुख्यधिकारी श्री.अय्युब सय्यद यांना सदरील समस्यांबाबी निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते जीशान शेख, अय्युब पठाण, सलिम शेख,अरिफ शहा,मलिक सहाब आदि मान्यवर उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की,मिल्लतनगर सेक्टर नं. ३ मधील नागरीकांच्या घरात पावसाळ्यात नेहमीच पावसाचे पाणी यासोबतच गटारीचे घाण पाणीही शिरते, यापासून सदरील परीसरातील नागरीकांना मोठ्या समस्यांचा सामना करणे भाग पडते आहे,मात्र श्रीरामपूर नगर पालिकेची कायमची उदासिनतेची भुमिका ही याठिकाणच्या नागरीकांसाठी मोठी संतापाची ठरत आहे. सर्वत्र चिखलमय रस्ते, परिसरात वाढलेले गवत हे डास, मच्छर उत्पत्ती चे कारण ठरत आहे, यापासून भविष्यात भयंकर रोगराईची साथ फैलण्याची शक्यता ही नाकारता येत नसल्याने सदरील परिसरात नगर पालिका प्रशासनाने त्वरित नागरी समस्यांबाबी आपले लक्ष केंद्रित करुन परिसरातील नागरीकांना या समस्येंपासून सुटकारा मिळणेकामी पुढाकार घेवून येत्या आठवडाभरात नगर पालिका प्रशासनाकडून योग्य पावले न उचलले गेल्यास येत्या दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीरामपूर नगर पालिकेसमोर शांतीच्या मार्गाने मोर्चे,धरणे आंदोलन, उपोषणे असा मार्ग स्विकारला जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जीशान शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, शहरातील मिल्लतनगर, वॉर्ड नं.१, सेक्टर नं.३ या भागातील नादुरूस्त गटारी तसेच सततच्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सदर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने स्थानिक नागरीकांची गैरसोय व आरोग्य धोक्यात येत असल्याने सदरील पावसाचे पाणी वाहून जाण्याकरीता कायमस्वरूपीचा योग्य बंदोबस्त करावा कारण काल – परवाच शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सदरील भागातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने मोठी तारांबळ उडाली तसेच दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर येथील सेक्टर नं.३ मधील नागरिकांच्या घरात शिरत असते.
सदर ठिकाणची जमीन ही उतारावरील असल्यामुळे येथे खुप मोठ्या प्रमाणावर जमीनीला ढाळ आहे. यामुळे सदर ठिकाणी पाऊस झाल्यानंतर खुप पावासचे पाणी साचत असल्याने सदर ठिकाणच्या नागरिकांना दररोजचे दळणवळणातील ये – जा करणे देखील मोठे दुरापास्त होते व झाले आहे. तसेच पावसाचे पाणी व त्याचबरोबर येथील गटारी या नादुरूस्त स्वरूपाच्या असल्यामुळे गटारींचे मलमिश्रीत घाण पाणी ओव्हरफ्लो होवुन सदरील ठिकाणच्या रस्त्यावर साचत असल्याने पावसाचे पाणी यासोबतच गटारीचे मलमिश्रित घाण पाणी घरात शिरत असल्याने सदर ठिकाणच्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील रस्त्यावर लोकांना पायी चालणे तसेच दुचाकी वाहनावरून प्रवास करण्याचे देखील मोठे धोक्याचे झाले आहे. सदरील भागातील पावसाचे पाणी सुयोग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याने श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.१, मिल्लतनगर सेक्टर नं.३ येथील नागरीकांना नेहमीच पावसाळ्यात अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढे आणखी काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याने नगर पालिका प्रशासनाने तात्काळ सदरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी प्राथमिक स्वरुपाची मोहीम हाती घ्यावी व सदर भागातील पावसाच्या पाण्याचा तसेच गटारीच्या घाण पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा.
अन्यथा सदरील भागातील सर्व त्रस्त नागरीक एकत्र येवुन नगर पालीकेवर मोर्चा काढतील व सदर मोर्चा दरम्यान होणाऱ्या बऱ्या व वाईट परिणामांस संबंधित नगरपालिका प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर मिल्लतनगर सेक्टर नं.३ मधील समस्त अनेक त्रस्त नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(संकलन समता न्यूज सर्व्हिसेस,श्रीरामपूर)