साने गुरुजी कथामालेची सीताराम सारडा विद्यालयात स्थापना
अहमदनगर (प्रतिनिधी) – साने गुरुजी यांच्या 125 जयंती वर्ष निमित्त सीताराम सारडा विद्यालय अहमदनगर येथे ‘साने गुरुजी कथामाले’ची स्थापना करण्यात आली. प्रसिद्ध नाट्य, चित्रपट कलावंत व लेखक उमेश घेवरीकर यांच्या हस्ते साने गुरुजी कथामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महेश डाळिंबकर, सावली संस्थेचे नितेश बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमोडे, मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी उमेश घेवरीकर यांच्या ’ मी साने गुरुजी बोलतोय ’ या अभिवाचन करण्यात आले. त्यांनी साने गुरुजींच्या आयुष्यातील अनेक संवेदनशील प्रसंग नाट्यपूर्ण अभिवाचन करत साने गुरुजींचे आयुष्य उलगडून दाखवले. त्यांचे सादरीकरण विलक्षण प्रभावी होते.
सुरुवातीला साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून ’ खरा तो एकचि धर्म ’ या प्रार्थनेचे सामूहिक गायन सर्वांनी केले. कथामाला स्थापन केल्यावर आता दर शनिवारी शाळेत मुलांना नियमित गोष्टी सांगितल्या जातील. शनिवारी शेवटचे दोन तास विद्यार्थ्यांना गोष्टी सांगितल्या जातील व बाहेरचे विविध मान्यवर येऊन मुलांना गोष्टी सांगतील. सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेत साने गुरुजी कथामाला हा उपक्रम सुरू करायला हवा, मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
श्री. घायाळ सर व राहींज मॅडम हे समन्वयक असतील. क्रांती मुंदानकर यांनी परिचय करून दिला व शीतल शिंदे यांनी सूत्रसंचलन केले तर अशोक डोळसे यांनी आभार मानले.