Vanchit Aaghadi | शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन वंचितचे उमेदवार हनीफ शेख यांची रॅली
नगर । दर्शक –
अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (दि.8 नोव्हेंबर) झाला. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन प्रचार फेरी काढण्यात आली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
प्रारंभी मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माळीवाडा येथील महात्मा फुले व जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. याप्रसंगी उमेदवार हनीफ जैनुद्दीन शेख, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, दिपक पाटोळे, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, लक्ष्मण माघाडे, गणेश राऊत, सुरेश पानपाटील, संजय शिंदे, दिनू भोसले, बबलू भिंगारदिवे, आबिद शेख, आरिफ रजवी, जैद सय्यद आदी उपस्थित होते.
हनीफ जैनुद्दीन शेख यांनी सेवा, संरक्षण व विश्वासाची हमी देणारा वंचित घटकातील उमेदवार सर्वसामान्यांना पर्याय देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. राजकीय घराणेशाहीचा वारसा थांबवून सर्वसामान्यांचे हातात सत्ता येण्यासाठी ही उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले.
योगेश साठे म्हणाले की, घराण्यांचा विकास नव्हे, तर सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे. यासाठी वंचितने विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले आहेत. ओबीसी आरक्षण वाचण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर करत असून, राजकारणात बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे कार्य ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिपक पाटोळे यांनी दलित, मुस्लिम, आदिवासी या वंचित घटकातील समुदायाला नेतृत्व देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले. महायुती व महाआघाडीने या समाजाचा फक्त व्होट बँक म्हणून वापर केला. या समाजाला नेतृत्व व न्याय देण्याचे काम प्रकाश आंबेडकर करत असल्याचे त्यांनी सांगितले.