गांधी विचारांच्या परीक्षेत सीताराम सारडाच्या 56 विद्यार्थ्यांचे यश
अहमदनगर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांना ‘महात्मा गांधी’ परिचित व्हावे म्हणून गांधींच्या जीवनाचा परिचय असलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून परीक्षा घेतली जाते. यातून विद्यार्थ्यांना गांधींच्या विचारांचा परिचय होतो.
या परीक्षेला सीताराम सारडा विद्यालयातून 56 विद्यार्थी बसले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या जीवनावर विविध पुस्तके दिली जातात व ती वाचून त्यावर परीक्षा घेतली जाते.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, सेवा दलाचे शिवाजी नाईकवाडी, सामाजिक कार्यकर्ते युनूसभाई तांबटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
युनूसभाई तांबटकर यांनी आजच्या विद्वेशाच्या काळात गांधी विचारांचा प्रसार होणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगितले.. गिरीश कुलकर्णी यांनी या बालवयात गांधींच्या विचारांचा परिचय होणे गरजेचे आहे.असे सांगून तुकडोजी महाराजांचे भजन विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतले. शिवाजी नाईकवाडी यांनी विद्यार्थ्यांशी विविध सामाजिक मुद्द्यांवर गप्पा मारल्या.
विद्यार्थ्यांना महात्मा गांधींची ओळख या अभ्यासातून झाली असे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.या उपक्रमाचे आलेल्या मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. शिक्षक दीपक आरडे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.
या उपक्रमात मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सुत्रसंचलन दिपक आरडे यांनी केले. क्रांती मुंदाणकर यांच्या ’वैष्णव जन तो ’ भजन गायनाने सांगता झाली.