वसंत व्याख्यानमाला पुष्प पहिले
(Photo Suresh Maid Ahmednagar)
अहमदनगर (प्रतिनिधी) – ज्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात जास्त दु:खी असतात, त्याच जास्त हासू आणि हसवू शकतात. दु:खाला सुद्धा विनोदाची किनार असते, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील प्रा.डॉ.विष्णू सुरासे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा वाचनालयात आयोजित वसंत व्याख्यानमालेत प्रा.डॉ.सुरासे यांचा ‘हास्यरंग’ हा कार्यक्रम झाला. यावेळी व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, अनंत देसाई, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, संचालिका शिल्पा रसाळ, प्रा.सौ.ज्योती कुलकर्णी, किरण आगरवाल, प्रा.मेधा काळे, निमंत्रित सदस्य चंद्रकांत पालवे आदि उपस्थित होते.
प्रा.सुरासे म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनात सुख-दु:ख, चढ-उतार असतात, पण जी व्यक्ती आयुष्यात अधिक टक्केटोणपे खाते, अधिक संघर्ष करते, ती जीवनाकडे अधिक सकारात्मक पद्धतीने पाहू शकते. आपल्या प्रत्येकाचे आयुष्य खूप सुंदर आहे. पण आपण त्याकडे कसे पाहतो, यावर आपला वर्तमानकाळ व भविष्यकाळ अवलंबून असतो. यावेळी प्रा.सुरासे यांनी त्यांच्या विविध हास्य कविता सादर केल्या.
श्री.गाडेकर यांनी वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेस शुभेच्छा दिल्या. व्याख्यानमालेची परंपरा वाचनालयाने सुरु ठेवल्याबद्दल कौतुक केले.
प्रास्तविकात प्रा.मोडक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शिल्पा रसाळ यांनी करुन दिला. प्रा.कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल अमोल इथापे, उपग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, वर्षा जोशी, संजय गाडेकर, विठ्ठलराव शहापुरकर हे व्याख्यान मालेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशिल आहेत.