निरंकारी सतगुरूंचा नववर्षानिमित्त पावन संदेश
नगर : दर्शक
“निरंकार प्रभूच्या रजेमध्ये जीवन जगणे हीच खरी साधना आहे.” असे प्रेरणादायी उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षाच्या शुभप्रसंगी दिल्लीतील ग्राउंड क्र. 8, बुराडी रोड येथे आयोजित विशेष सत्संग समारंभात विशाल संख्येने उपस्थित भक्तांपुढे व्यक्त केले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सतगुरु माता जी व निरंकारी राजपिता जी यांच्या पावन सान्निध्यात दिव्य दर्शन व प्रेरणादायी प्रवचनांद्वारे सर्व भक्तांनी आत्मिक शांती व आध्यात्मिक ऊर्जेचा आनंद अनुभवला.
सतगुरु माता जी यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की
प्रत्येक भक्ताची हीच इच्छा असते की प्रत्येक नवे वर्ष त्याला पूर्वीपेक्षा अधिक दृढतेने सेवा, सिमरण व सत्संगाशी जोडून ठेवण्याबरोबरच आपल्या सांसारिक जबाबदाऱ्याही पूर्ण निष्ठेने पार पाडता याव्यात. जेव्हा जीवनच संदेश बनते आणि शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी ठरतात, तेव्हाच खरी साधना प्रकट होते. याच क्षणी, पूर्ण जागृत अवस्थेत, निरंकाराच्या अनुभूतीत जगणे हेच खरे जीवन आहे, कारण भूतकाळ आणि भविष्य हे मायेचे स्वरूप आहे. जेव्हा मनात हा विश्वास दृढ होतो की कालही ईश्वराची मर्जी होती आणि आजही त्याचीच कृपा आहे, तेव्हा चिंता आपोआप दूर होते आणि जीवन सहज व संतुलित बनते.
नववर्ष म्हणजे केवळ तारखेतील बदल नाही, तर प्रेम, गोडवा, सौम्यता आणि समजूत स्वीकारण्याची संधी आहे. मनमुटाव आणि द्वेषापासून दूर राहून, इतरांच्या भावना समजून घेत, दोषांवर पडदा टाकून गुणांना स्वीकारणे हीच खरी भक्ती आहे. प्रत्येक श्वासात प्रभूचे ध्यान बनून राहावे, प्रत्येक क्षणी निरंकाराचा निवास हृदयात कामय राहावा, हाच नववर्षाचा खरा अर्थ आणि संदेश आहे. नववर्षाच्या निमित्ताने सतगुरु माता जी यांनी शेवटी सर्व श्रद्धाळूंना सुख, समृद्धी आणि आनंदमय जीवनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.
