डॉ.विखे पा.कृषी महाविद्यालयात ‘कृषी गाथा 2023’ उत्साहात साजरे
(Photo Vijay Mate Ahmednagar)
अहमदनगर (प्रतिनिधी) – आजचे युग हे स्पर्धात्मक असे आहे, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. मग नोकरीसाठी, व्यवसायासाठी, कला-क्रिडा क्षेत्रातही स्पर्धा होत आहे. कृषी पदवीसाठी बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. पदवीधर होऊनही नोकरी मिळवणे तारेवरची कसरत असते. विद्यार्थ्यांनी व्यवसायाकडे पाहताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर अवघड काही नाही. प्रत्येक कृषी महाविद्यालयात आता व्यावसायायिक फोरम स्थापन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.शरद गडाख यांनी केले.
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे कृषी महाविद्यालयात ‘कृषी गाथा 2023’ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध स्पर्धेतील विजेत्या संघांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.शरद गडाख, फौंडेशनचे विश्वस्त अॅड.वसंतराव कापरे, जनरल सेक्रेटरी डॉ.पी.एम.गायकवाड, उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, उपप्राचार्य डॉ.एस.बी.राऊत आदि उपस्थित होते.
डॉ.गडाख पुढे म्हणाले, कृषी पदवीसाठी विद्यार्थ्यांनी शेतपिका बरोबर फळबागे खालील क्षेत्रासोबत उत्पादन वाढविणे, सेंद्रीय शेती प्रकल्प, देशी गाय संशोधन आणि एकात्मिक शेती व्यवस्थापन करुन जास्तीत जास्त क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आणून बिजोत्पादन वाढविणे. मॉडेल व्हिलेज, विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पंचसुत्री व्यवस्थापन बाबत सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कृषी क्षेत्रात ठसा उमटविण्यासाठी स्पर्धा परिक्षा फोरम, बँकींग फोरम स्थापन कराणे ही काळाची गरज बनली असल्याचे सांगितले.
अॅड.वसंतराव कापरे यांनी आपल्या भाषणात शिक्षणाबरोबरच खेळाकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, त्यामुळे सर्वांगिण विकास होतो. संस्थेच्या, महाविद्यालयाच्या वाटचालीबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. विविध स्पर्धा, परिक्षा, कला,क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी करुन राष्ट्रीय पातळीवरील खेळांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाचे तसेच संस्थेच्या नावलौकिकात भर पडत चालली आहे, असे सांगितले.
यावर्षी कृषी गाथा 2023 च्या वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच क्रीडा क्षेत्रात क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, बॅडमिंटन, गोळाफेक, कबड्डी, रस्सीखेच अशा स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये खेळाडूंनी चांगली कामगिरी दाखवून यश मिळविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिपीका मावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.एच.एल. शिरसाठ यांनी मानले.