राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य देत प्रश्न सोडविले – खा.सुजय विखे

 बोल्हेगाव येथील रस्त्यांच्या कामाचे खा. सुजय विखे पा. व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य देत प्रश्न सोडविले - खा.सुजय विखे



     अहमदनगर (प्रतिनिधी)  – नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण कधीही राजकारण केले नाही. ज्या भागात गरज असेल, त्या भागात विकास कामांना प्राधान्य देऊन तेथील प्रश्न सोडविले आहे. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष, व्यक्ती याकडे न पाहता आवश्यकतेनुसार प्रत्येक भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. 


बोल्हेगांव परिसरातील प्रलंबित कामांबाबत येथील नगरसेवक, पदाधिकारी यांनी आपणाकडे निधीची मागणी केली, ती आपण पालकमंत्र्यांकडे मांडून जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्या माध्यमातून येथील विकास कामे मार्गी लागतील.  


नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक सर्वांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत, त्या संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम झाले आहे, त्या योजनांचा अनेकांना लाभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने सज्ज रहावे, असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.


     बोल्हेगांव येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी खासदार डॉ.सुजय विखे पाटील व शहराचे आमदार संग्राम जगताप, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, माजी नगरसेवक मदन आढाव, माजी नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक सचिन जाधव, अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत होते.


     यावेळी आ.संग्राम जगताप म्हणाले, शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेत विविध विकास कामांसाठी मोठा शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेतला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रत्येक भागातील प्रश्न या निधीच्या माध्यामातून मार्गी लागले आहेत. 


त्यामुळे नगर शहर एक विकसित शहर निर्माण झाले आहे. बोल्हेगांव परिसरात होत असलेल्या या कामांमुळे येथील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. विकास कामांसाठी आम्ही एकत्रित काम करुन शहरचा चेहरा-मोहरा बदलत असल्याचे सांगितले.


     अहमदनगर बोल्हेंगाव प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी जिल्हा नियोजन अंतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांच्या वतीने गणेश चौक ते बोल्हेंगाव रोड या रस्त्यासाठी एक कोटी 75 लाख रुपये डांबरीकरणासाठी, आंबेडकर चौक ते गांधीनगर पर्यंतच्या रस्त्यासाठी दोन कोटी सत्तर लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.


      स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव, युवा सेनेचे आकाश कातोरे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, यांनी वेळोवेळी पाच वर्ष महापालिकेकडे पाठपुरावा केला परंतु या रस्त्यासाठी कोणताही निधी महापालिकेकडून न मिळाल्याने या शिवसेनेच्या चारही नगरसेवकांनी अखेर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजय विखे यांच्याकडे या रस्त्याचे काम व्हावे यासाठी पाठपुरावा केला व त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत या रस्त्यासाठी पालकमंत्री ना.विखे पाटील व खा. सुजय विखे यांनी निधी मंजूर करून दिला.