वाचनानेच माणूस समृद्ध बनतो- प्राचार्य बी.बोर्डे
डॉ. पाऊलबुधे तंत्रनिकेतन महाविद्यालयात अब्दुल कलाम यांना अभिवादन
नगर – भारताचे माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना वाचन व लेखन याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी अग्निपंख नावाने आत्मचरित्र लिहिले. तसेच एकूण 24 पुस्तके केवळ विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लिहिली. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून स्वतःचे ज्ञान दृढ करावे हा त्यांचा उद्देश होता. वाचनानेच माणूस समृद्ध बनतो. त्यासाठी लहान वयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी असे प्रतिपादन प्राचार्य बाळासाहेब बोर्डे यांनी केले.
नारायणडोह येथील डॉ. ना.ज. पाऊलबुधे तंत्रनिकेतन महाविद्यालयात मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य बाळासाहेब बोर्डे, प्रा. जयश्री होले, जाबीर अली प्रा. रेखा रोटे,विश्वनाथ आदवडे, सुदर्शन लोखंडे, शशिकला देवकर, ओसामा सय्यद, राजेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते. प्राचार्य बोर्डे पुढे म्हणाले सोशल मीडियाच्या आहारी न जाता युवकांनी वाचनाची आवड निर्माण करावी. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन ग्रंथालयातील पुस्तके, साहित्य संमेलनातील पुस्तके वाचावित त्या साठी सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करावे. समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी वाचन संस्कृती टिकवायला हवी.
यावेळी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षण, मोफत व फी भरून शिक्षण, इलेक्ट्रॉनिक मीडिया व पुस्तके, मानव व यांत्रिक मशीन अशा विषयांवर स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सर्वांनी सहभाग घेऊन सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकला देवकर, जयश्री होले, रेखा रोटे, जाबीर अली, ओसामा सय्यद, सुदर्शन लोखंडे, विश्वनाथ आदवडे, राजेंद्र देशपांडे , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.