तळागाळातील गोरगरिबांच्या महिलांचे जीवनमान उंचावणे हेच खरे महिला दिनाचे उद्दिष्ट – महापौर ज्योतिताई गाडे
नगर : दर्शक ।
केंद्र व राज्य शासनाने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या असून त्याचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गोरगरिब महिलांपर्यंत पोहोचवणे यातच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होतो, असे प्रतिपादन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर ज्योतिताई गाडे यांनी केले. भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष स्वाती सिरसुल व नगरसेविका मयुरी जाधव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शितलताई संग्राम जगताप यांची होती.
या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा तसेच नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना शितल जगताप यांनी सांगितले की, महिलांच्या कार्याचा गौरव करणारे असे कार्यक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. यामुळे इतर महिलांनाही विविध क्षेत्रांत कार्य करण्याची प्रेरणा मिळते. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्वाती सिरसुल व मयुरी जाधव यांचे अभिनंदन केले.
भाजप महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांचे संघटन अधिक बळकट होते आणि त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सक्षम व्यासपीठ निर्माण होते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असून त्या पूर्ण करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी विविध योजना राबवल्या आहेत. मात्र या योजना प्रत्यक्षात सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महिलांनी सामूहिकरित्या उचलावी, असा निर्धार श्वेता झोंड, कालिंदी केसकर, सुजाता औटी, संध्या पावसे, रेणुका करंदीकर, स्वाती पवळे, ज्योती दांडगे, रेखा मैड, जोशना मुंगी, अर्चना बनकर, राखी आहेर, पल्लवी जाधव, पद्मा बोरुडे, मीरा सरोदे, कावेरी घोरपडे, उज्वला भांगे, सुरेखाताई जंगम, लीला अग्रवाल आदी महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा व शौर्याचा आदर्श महिलांनी अंगीकारावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. “सन्मान अहिल्याच्या लेकींचा” या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये फॅशन डिझायनर वैष्णवी रोकडे, चार्टर्ड अकाउंटंट सुनंदा रच्चा, गायिका इलाक्षी पाथरे, अॅड. सुजाता बोडके, प्रतीक्षा मंगलारम, अॅड. वंदना पालवे, डॉक्टर भावना व भाग्यश्री पेंडम, ब्युटीशियन व हेअर स्टायलिस्ट सौ. सुनीता पुंड व सौ. अनुजा कांबळे, उद्योजिका पूजा राठोड, फॅशन डिझायनर पूजा बेद्रे, पत्रकार स्नेहा जोशी, संगीत विशारद दीप्ती द्यावंनपल्ली, न्यूज चॅनेल संपादिका श्रुती बत्तीन, एपीआय मुंबई अमृता जाधव आदी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
तसेच भाजपाच्या नूतन महिला नगरसेविका शारदा ढवन, रोशनी त्रिंबके, सोनाबाई शिंदे, सुनीता कुलकर्णी, वर्षा सानप, आशाबाई कातोरे, शितलताई ढोणे, हरप्रीत कौर गंभीर यांचाही शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे, कालिंदी केसकर, नगरसेविका शितल ढोणे, महिला व बालकल्याण उपसभापती वर्षा सानप, स्नेहा जोशी, प्रणाली कडूस, शामला बोरा आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वाती सिरसुल यांनी महिलांनी संघटित होऊन सक्षमीकरणासाठी सक्रियपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तर नगरसेविका मयुरी जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
.webp)