Samarth Vidyamandir Nagar | श्री समर्थ विद्यामंदिर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात क्रीडांगणात रंगला उत्साह ; विद्यार्थ्यांचा दणदणीत सहभाग
नगर : दर्शक ।
श्री समर्थ विद्या मंदिर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या औचित्याने वाडिया पार्क मैदानावर विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने शाळेच्या क्रीडा विभागातर्फे या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते.
क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक अजय महाजन यांच्या हस्ते झाले. त्यांनी हवेत फुगे सोडून व श्रीफळ वाढवून स्पर्धांना प्रारंभ केला. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मैदानावर रंगलेल्या या स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक अजय महाजन म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळांचा मोठा वाटा आहे. अभ्यास आणि बौद्धिक उपक्रमांसोबतच मैदानी खेळ हे आरोग्य, शिस्त, सहकार्य ,संयम टीमवर्क आणि मानसिक सुदृढतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. शाळेत दरवर्षी पाठांतर, निबंध, हस्ताक्षर, चित्रकला अशा स्पर्धा घेतल्या जातात; परंतु विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विकास व्हावा म्हणून कबड्डी, खो-खो, लंगडी, धावणे, संगीत खुर्ची यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करणे शाळेची परंपरा आहे.
या स्पर्धांचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष भा.ल.जोशी, उपाध्यक्ष दीपक ओहोळ, चेअरमन विकास सोनटक्के, व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सेक्रेटरी प्र.स. ओहोळ, सु.आ. क्षीरसागर तसेच संस्थेचे खजिनदार श्री संजय कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य ॲड. के.एम. देशपांडे, सप्नील कुलकर्णी, सौ. संध्या कुलकर्णी, श्री वेद देशपांडे, श्री सुनील जोशी, श्री सचिन क्षीरसागर, श्री स्वप्निल सोनटक्के यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले.
कबड्डी, खो-खो, लंगडी, शर्यती, बॉल थ्रो, संगीत खुर्ची अशा अनेक खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मैदानावर मुलांच्या जलद हालचाली, मुलींची खो-खोतील चुरस, धावण्यातील वेग, आणि छोट्या गटातील संगीत खुर्चीतील उत्साहाची स्पर्धा असे विविध रंग मैदानावर खुलले. पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीमुळे स्पर्धांना अधिक उत्साह प्राप्त झाला.
स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन सतीश मेढे, शंकर निंबाळकर आणि संदीप गायकवाड यांनी काटेकोरपणे केले. सुरक्षिततेच्या सर्व बाबींची दक्षता घेत संपूर्ण दिवस विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.
विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे प्रशस्तीपत्रे व गौरवचिन्हे स्नेहसंमेलन कार्यक्रमात देण्यात येणार आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे क्रीडा स्पर्धांना उत्साहाची, आनंदाची आणि आरोग्यपूर्ण वातावरणाची भर पडली.
