Snehalaya Nagar | पोलिसांनी अधिक संवेदनशीलता दाखवली तर मुलींवरील अत्याचार,छेडछाडीचे गुन्हे वेळीच रोखता येऊ शकतील – सोमनाथ घारगे
Snehalaya Nagar | नगर : दर्शक ।
नगर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. गुन्हेगारी आणि अत्याचाराचे घटना रोजच घडत आहेत. बालकांवरील अत्याचार कमी होण्यास तयार नाही. पोलिसांनी अधिक संवेदनशीलता दाखवली तर मुलींवरील अत्याचार, छेडछाडीचे गुन्हे वेळीच रोखता येऊ शकतील असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी व्यक्त केले
स्नेहालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस दीदी आणि अधिकाऱ्यांसाठी पोलिस दीदी प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी पोपट धामणे, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, युवानिर्माण प्रकल्पाचे संचालक डॉ. विनय कोपरकर, स्नेहाधार प्रकल्पाचे संचालक अॅड. श्याम आसावा, भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक प्रियंका आठरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक घारगे पुढे म्हणाले शाळकरी मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना पाहता त्या रोखण्यासाठी पोलीस दीदी सारखे उपक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. मुलींच्या पाठलाग छेडछाड या गोष्टींची गंभीर दखल घेतली तर संभाव्य गुन्हे टाळता येऊ शकतील.
बंदोबस्त किंवा गुणाच्या तपासा इतकेच अशा प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करणे अत्यंत गरजेचे असते. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन पोलीस दीदींनी काम केले तर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे निश्चित घटतील. पोलीस दीदी प्रशिक्षण कार्यशाळेत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पोलीस दीदी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस दीदी संकल्पना आणि बालकां संदर्भातील कायदे
अॅड. श्याम आसावा यांनी पोलीस दीदी संकल्पना आणि कायदेबाबत माहिती दिली. बालकांच्या सुरक्षेसाठी सुरु केलेली मोहीम म्हणजे पोलीस दीदी उपक्रम. पोलीस दीदी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे संरक्षक, मित्र आणि मार्गदर्शक म्हणून काम करतील. वेळेवर मदत न केल्यास या समस्या त्यांच्या भविष्याला कायमचे नुकसान पोहोचवू शकतात, अशा परिस्थितीत पोलीस दीदी त्यांना आवश्यक ती मदत देऊ शकतात.
डॉ. विनय कोपरकर यांनी बालकांसोबत संवाद साधतांना कोणकोणत्या माध्यमांचा वापर केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. खुले प्रश्न अधिक विचारले तर बालके जास्त बोलके होतात. बालकांची विचारधारा सुधारण्यास मदत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संकट आणि आघातमधील मुलांशी संवाद आणि समुपदेशन
डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी संकट आणि आघातमधील मुलांशी संवाद आणि समुपदेशन या विषयावर मनोगत व्यक्त केले. मुलांच्या मनातील तणाव समजून घेणे. मुलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करणे. थेट प्रश्न विचारण्याआधी मुलांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा. मुलांना सहज समजेल अशी सोपी आणि मैत्रीपूर्ण भाषा वापरा. स्वतः कमी बोला आणि मुलांचे जास्त ऐका. मुलांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना मान्यता द्या. आघातामुळे (Trauma) मुलांच्या वागण्यात होणारे बदल समजून घ्या. मुलांनी सांगितलेल्या गोष्टींची गोपनीयता जपा. शाळेतील शिक्षक आणि समुपदेशक यांच्यासोबत समन्वय काम करा. मुलांना सक्षम करा आणि त्यांच्या सुरक्षिततेवर भर द्या, असे आवाहन केले.
डॉ. तेजस्विनी मिस्कीन यांनी बालकांच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर मार्गदर्शन केले. भावनिक मनस्थितीमध्ये भीती, अस्वस्थ, एकलेपणा, लाज, शरम वाटणे. वर्तणुकीच्या समस्यांमध्ये चिता, राग अनावर होणे, लैंगिक वर्तनावर होणारे परिणामबाबत माहिती दिली.
कार्याक्रमचे सूत्रसंचालन विद्या घोरपडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष धर्माधिकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ दाभाडे, रुपाली सोयम, मंदाकिनी मोकळ, विकास सुतार, प्रविण कदम, विनायक महाले, प्रियंका कोंगळ, सागर भिंगारदिवे, देव मोदी, आयुषा जाधव आदींनी परिश्रम घेतले.

