Padmashali Trust | पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टतर्फे वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप
Padmashali Trust | नगर : दर्शक । आषाढी वारीनिमित्त कल्याण रोड, जिजाऊ नगर, अहिल्यानगर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या पद्मशाली मार्कंडेय महामुनी दिंडी सोहळा ट्रस्टच्या वारकऱ्यांसाठी पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना राजगिरा लाडू, वेफर्स आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. भक्तिमय वातावरणात, विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात हा सेवा उपक्रम पार पडला. वारकऱ्यांनीही ट्रस्टच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष गणेश लक्षेट्टी, सचिव अजयकुमार लयचेट्टी, वरद लक्षेट्टी, श्रावणी लक्षेट्टी तसेच ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य आणि सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष गणेश लक्षेट्टी म्हणाले की, “वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आत्मा आहे. वारकऱ्यांची सेवा करणे म्हणजे समाजसेवेबरोबरच विठ्ठलाची सेवा करण्याचे भाग्य लाभणे होय. पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्ट स्थापनेपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवत आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप हा आमचा केवळ कार्यक्रम नसून सामाजिक कर्तव्याचा एक भाग आहे. भविष्यातही समाजहिताचे आणि गरजूंसाठी उपयुक्त ठरणारे विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा आमचा संकल्प आहे.”
पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने दरवर्षी आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना प्रवासात थोडासा दिलासा मिळत असून ट्रस्टच्या सेवाभावी कार्याची समाजात प्रशंसा होत आहे.
यावर्षीही अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सेवा उपक्रम पार पडला. अल्पोपहारानंतर पद्मशाली मार्कंडेय महामुनी दिंडी सोहळा विठ्ठलाच्या नामघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
